जामखेड – पिंपळगाव उंडा व वाघासह तालुक्यातील सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पीक, ज्वारी, कांदा व तूर यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारने जाहीर केलेल्या नुकसान अनुदान देणेकामी पंचनाम्यासाठी पाठवलेले अधिकारी योग्य त्या पद्धतीने पंचनामे करत नसून टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ शेतकर्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून संताप व्यक्त केला. जर पंचनामे व्यवस्थित केले नाहीत, तर पंचनामे करणार्या अधिकार्यांना काळे फासण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, लांब तूर आदी पिके पूर्णपणे भुईसपाट झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसान अनुदान देणे कामी ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे, ते अधिकारी मनमानी कारभार करत योग्य पद्धतीने पंचनामा करत नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सरकारने जाहीर केलेल्या अनुदानापासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
या वेळी गणेश ढगे, सतीश ढगे, आश्रू शिंदे, मोहन ढगे, सदाशिव ढगे, अरुण ढगे, हनुमंत ढगे, बाबासाहेब ढगे, भाऊसाहेब जाधव, नारायण गव्हाणे, शिवाजी पवार, विजय कुलकर्णी, तात्याराम ढगे, अमोल ढगे, लक्ष्मण जगताप, साखरबाई गव्हाणे, बळीराम ढगे, सुभाष बजगुडे, काशीबाई बजगुडे, नवनाथ गव्हाणे, विश्वनाथ जगताप, बाप्पू पवार, उमेश ढगे, मन्सूर शेख, रमजान शेख, सिद्धार्थ साळवे, सिद्धेश्वर सुतार, मुरलीधर मोहळकर, मित्रजित भालेराव, विठ्ठल जगताप, बालाजी जगताप आदी उपस्थित होते.