मुंबई – भारतीय रिझर्व्ह बॅंकेने अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या संचालक मंडळावर कारवाई केली आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाला 12 महिन्यांच्या कालावधीसाठी हटवण्यात आले आहेत. या सहकारी बॅंकेत मोठ्या प्रमाणावर निम्न-मध्यमवर्गीयांची खाती आहेत. बॅंकेवर कारवाई झाल्याने ग्राहकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.
रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकेच्या कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची “प्रशासक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकासोबतच आरबीआयकडून सल्लागारांची समिती देखील नियुक्त करण्यात आलेली आहे. संचालक मंडळाकडून खराब प्रशासन मानकांमुळे ही कारवाई करणे आवश्यक असल्याचे आरबीआयने सांगितले.
दरम्यान, आरबीआयकडून बॅंकेवर कोणतेही व्यावसायिक निर्बंध घातलेले नाहीत. त्यामुळे बॅंकेचे व्यवहार सुरळीत राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.