हैदराबाद – तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या कन्या के.कविता यांनी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) सत्ता राखेल, असा विश्वास व्यक्त केला. सेंच्युरी मारून बीआरएस विजयाची हॅट्ट्रिक करेल, असे त्यांनी म्हटले.
तेलंगणात विधानसभेच्या एकूण 119 जागा आहेत. त्यातील 100 जागा जिंकण्याइतका पल्ला बीआरएस गाठेल, असे पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कविता यांनी सूचित केले. कुणालाही बहुमत नसणारी त्रिशंकू स्थिती उद्भवण्याची शक्यता त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. एमआयएम हा आमचा मित्रपक्ष आहे. त्याशिवाय, इतर कुठल्याही पक्षाशी आमचा समझोता झालेला नाही. तेलंगणाच्या लढतीत भाजप कुठेच नाही. तर, कॉंग्रेसचे आव्हान आमच्यापासून खूप दूर आहे, असे त्या म्हणाल्या.
सलग 10 वर्षे सत्तेत असल्याने बीआरएस विरोधात काही ठिकाणी प्रस्थापितविरोधी स्थिती असू शकते. पण, बीआरएसविषयी जनतेच्या मनात रोष नाही. आमच्या योजनांचा लाभ न मिळालेले नाराजी व्यक्त करतील. पण, उद्या तो लाभ मिळेल असा विश्वासही बोलून दाखवतील. आम्ही सातत्याने जनतेत असतो. कठोर मेहनत घेतल्याने आम्हाला निवडणुकीची परीक्षा सोपी वाटते, अशी भूमिका कविता यांनी मांडली.