पहिल्यांदाच विक्रमी दर ः हंगामात नऊ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने या हंगामातील उसाच्या हप्त्याची रक्कम पुन्हा वाढवली असून एकरकमी 3 हजार रुपये पहिला हप्ता कारखाना देणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी याची आज घोषणा केली.
श्री छत्रपती कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरू झाला असून, या हंगामात कारखान्याने नऊ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचा नोंदलेला सात लाख टन व बाहेरील गेटकेनचा दोन लाख टन ऊस गाळप करण्याचे कारखान्याचे नियोजन आहे. श्री छत्रपती कारखान्याने काही दिवसांपूर्वीच या हंगामातील गाळपास येणाऱ्या उसाला पहिला हप्ता म्हणून प्रतिटन 2900 रुपये जाहीर केला होता; मात्र आज कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व अमोल पाटील यांनी पुन्हा यामध्ये शंभर रुपयांची भर घालत, 3 हजार रुपये प्रतिटन या विक्रमी हप्त्याची घोषणा केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना आजपर्यंत योग्य दिशेने वाटचाल करीत आला आहे. सध्या कारखाना थोड्याफार प्रमाणात अडचणीत आला असला तरी यंदाच्या ऊस गळीत हंगामात सर्व ऊस उत्पादक सभासदांनी छत्रपती साखर कारखान्यास ऊस गणितात द्यावा त्यामुळे कारखाना आर्थिक अडचणीतून नक्की बाहेर पडेल.
कारखान्याची कसोटी!
यंदाच्या गळीत हंगामात छत्रपती सहकारी साखर कारखाना अनेक संधी आहेत; परंतु यामध्ये कारखान्याला कसरत देखील करावी लागणार आहे. या हंगामात ठरल्यानुसार गाळपाचे उद्दिष्ट पार पडले तर कारखान्यापुढील सहवीजनिर्मिती, विस्तारवाढ यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होऊन कारखाना सुस्थितीत येण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कार्यक्षेत्रातील उच्च साखर उताऱ्याचा ऊस सभासदांनी केवळ या हंगामापुरता विचार करून बाहेरील कारखान्यांना घातला नाही तर ऊस उत्पादकांना याहूनही अधिकचा दर देण्यासाठी कारखान्याला संधी असल्याचे मत काटे व पाटील यांनी व्यक्त केले आहे.
सभासदांनी सहकार्य करावे
दरम्यान कारखान्याच्या ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी नोंदवलेल्या परंतु ऍडव्हान्स न घेतलेल्या वाहतूक यंत्रणेपैकी काहीजण बाहेरील कारखान्याशी करार करून पाहत आहेत अशांनी कारखान्याची यावर्षीची गरज लक्षात घेऊन बाहेर तोडणी व वाहतूक करणे टाळावे आणि सभासदांनीही बाहेर ऊस देणे टाळावे जेणेकरून कारखान्याच्या म्हणजेच स्वतःच्या मालकीच्या कारखान्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये हातभार लावण्याची मोठी साथ मिळू शकते. यासाठी सभासदांच्या सहकार्याची गरज आहे. असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले.