नगर – पालकमंत्री, खासदारांचे पत्र असेल तरच प्रस्ताव मंजूर, हे माझ्या पारनेर मतदारसंघात चालणार नाही. त्यांनी ग्रामपंचायतीची नावे दिली म्हणजे झाले असे नाही. नवबोद्ध अनुसूचित जाती वस्ती सुधार योजनेत राजकारण करू नका, लोकसंख्येच्या निकषानुसार प्रस्ताव मंजूर करा, पाथर्डीतच्या गटविकास आघाडीच्या कार्यालयात खासदारांचा खासगी स्वीय सहाय्यक कसा बसू शकतो. तो ज्या गावांचे प्रस्ताव देईल, ते स्वीकारले कसा जातात, हे चुकीचे आहे. वस्ती सुधार योजनेत राजकारण केल्यास जिल्ह्यातून 25 हजार लोकांचा मोर्चा जिल्हा परिषदेत आणून आंदोलन करेल, असा इशारा आमदार नीलेश लंके यांनी सोमवारी दिला.
आमदार लंके आज दुपारी जिल्हा परिषदेत आले. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन वस्ती सुधार योजना व जलजीवनच्या कामांबाबत चर्चा केली. यावेळी आ. लंके म्हणाले की, पाथर्डी तालुक्यातील पण राहुरी मतदारसंघातील अनेक गावांमधील वस्ती सुधार योजनेचे प्रस्ताव स्वीकारण्यात आले नाही. त्यावर सीईओ येरेकर म्हणाले की, यंदा वस्त्यांची निवड करण्यास विलंब झाला असून प्रस्ताव व आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे .त्यामुळे कोणाचे प्रस्ताव अद्याप घेतले नाही.
यावर आ. लंके म्हणाले की, पाथर्डीमध्ये ग्रामपंचायतींचे प्रस्ताव घेण्यात येत असून खासदारांचे खासगी स्वीय सहाय्यक हे प्रस्ताव दाखल करीत आहे. ठराविक ग्रामपंचायतींचे प्रस्ताव घेण्यात येत आहे. तो स्वीय सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसून असतो. त्याला कसे बसू दिले जात आहे. यावेळी आ. लंके यांनी पाथर्डीच्या गटविकास अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांचीही झाडाझडती घेतली.
वस्ती सुधार योजनेत राजकारण करू नका, त्यांच्या हक्काचा निधी असून लोकसंख्येच्या निकषानुसार ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी निधी मिळतो. त्यात खोडा कोणी घालून अन्याय करीत असेल तर जिल्ह्यातून 25 हजार लोकांचा मोर्चा जिल्हा परिषदेत आणून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी आ. लंके यांनी जलजीवनच्या कामांबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावर सीईओ येरेकर यांनी याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आ. लंके म्हणाले की, खासदार व आमदार प्रत्येकी 50 टक्के विकास कामांचे प्रस्ताव हे गणित माझ्या पारनेर मतदारसंघात चालणार नाही. आमदारांना विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नका, कोणीही काही सांगत असले पण मला विचारल्याशिवाय प्रस्ताव मंजूर करू नका, हंगा ग्रामपंचायतीच्या प्रस्तावामध्ये त्रुटी काढण्यात आल्या आहे. त्या दुरुस्त करू लगेच प्रस्ताव मंजूर करा. असे आ. लंके म्हणाले.
नवबोद्ध अनुसूचित जाती वस्ती सुधार योजनेत जिल्ह्यात समान वाटप होणे आवश्यक आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार निधी मिळतो. पण वस्त्यांची निवड करतांना समानतेचा निकष लावा. मात्र तेथेही राजकारण करण्यात येत आहे. पुढाऱ्यांचे स्वीयसहाय्यक कोणते प्रस्ताव स्वीकारायचे अन् नाही हे ठरविणार का? अशा पद्धतीने राजकारण करणे चुकीचे आहे. जलजीवनमध्ये कागदपत्रांची पुर्तता नसतांनाही कामे देण्यात आली आहे. याबाबत चौकशीची मागणी केली आहे.
नीलेश लंके, आमदार