बटाट्याचा पाला खाल्ल्याने विषबाधा ः अजून 40 गायी गंभीर
मंचर – निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे बटाट्याचा पाला खाऊन विषबाधा झाल्याने 20 गायींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 7) घडली असून, या गायी राजस्थानी व्यावसायिकाच्या आहेत. यामध्ये आतापर्यंत त्यांचे सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले असून, अजून 40 गायींची प्रकृती गंभीर आहे.
निरगुडसर मेंगडेवाडी हद्दीवरील रस्त्यावर राजस्थान येथून आलेले लाल गायीवाले गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. उदरनिर्वाहासाठी ते दुग्धव्यवसाय आणि शेणखताची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. निरगुडसर आणि आजूबाजूच्या परिसरातील फ्लॉवरचा, बटाट्याचा पाला, कांद्याची पात आणि शेतकऱ्यांनी शेतात सोडून दिलेला भाजीपाला, तरकारी खाण्यासाठी ते गायींसाठी घेऊन येतात.
दोन दिवसांपूर्वी हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड यांनी थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील एका शेतकऱ्याचा शेतात कापून ठेवलेला बटाट्याचा पाला गायींना खाण्यासाठी आणला होता. हा पाला खाल्ल्यानंतर गायींना विषबाधा झाली असून आतापर्यंत 20 गायी मृत्युमुखी पडल्या आहेत आणि अजून सुमारे 40 गायी मरणाच्या दारात आहेत. गुरांचे सरकारी डॉक्टरांनी गायींवर औषधोपचार केले असून, विषबाधा मोठ्या प्रमाणात झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या गायांचा कुठलाही विमा नसल्याने या राजस्थानी व्यावसायिकास नुकसान भरपाई मिळणे कठीण आहे. आंबेगाव तालुका प्रशासन यांनी या घटनेची दखल घेऊन त्यांना मदत करावी, अशी मागणी निरगुडसरचे प्रगतशील शेतकरी रामदास थोरात यांनी केली आहे. सरपंच रवींद्र वळसे पाटील, निरगुडसरचे तलाठी पी. एम. मुगदळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल तळेकर, माजी. उपसरपंच आनंदराव वळसे पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष कोरके, विक्रम मेंगडे, हरिश सुडके यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून पाहणी केली आहे.
हे राजस्थानी भटके लोक असून गीर गायीचे संगोपन करतात आणि गायींसाठी परिसरातील चारा किंवा पाला विकत घेऊन गायींचे पोषण करतात. त्याप्रमाणे त्यांनी हा बटाट्याचा पाला घेतला आहे. याबाबत पाहणी करून त्याचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत. बटाट्यावर कीटकनाशक मारले असावेत आणि तो पाला गायींच्या खाण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, खरे कारण तपासणी अहवाल आल्यावरच समजेल.
डॉ. अमोल तळेकर, पशुवैद्यकीय अधिकारी, निरगुडसर