पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊनही गरीब गरजू 2 हजार 402 विद्यार्थी दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचितच राहिले आहेत. शाळांनी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याची माहितीच दिली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यावरुन शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे.
विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी घेण्यात येत असते. त्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर करुन शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येत असते. शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यातच जमा करावी लागते.
यासाठी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याची माहिती घेऊन ती ऑनलाइन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांवर असते. बहुसंख्य शाळांनी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याची माहितीच भरली नसल्याने शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची 2022 व 2023 या दोन वर्षांची रक्कमच मिळू शकलेली नाही. ही अत्यंत गंभीर स्वरापाची बाब आहे.
2022 मध्ये घेण्यात आलेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्तीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या चुकीच्या बॅंक खात्याची माहिती दुरूस्त करण्यासाठी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र, तरीही अद्यापपर्यंत 4 हजार 632 पैकी पाचवीच्या 1 हजार 380 आणि आठवीच्या 1 हजार 22 विद्यार्थ्यांच्या चुकीच्या बॅंक खात्याची सुधारित माहिती संबंधित शाळेने भरलीच नाही. अद्यापही माहिती भरणे प्रलंबितच आहे.