नवी दिल्ली :- संघासाठी तुम्ही किती धावा करता त्यापेक्षा संघाचा विजय झाला का, हे जास्त महत्त्वाचे आहे, असा सल्ला भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू गौतम गंभीर याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला दिला आहे. सामना कोणत्याही संघाविरुद्ध असो वैयक्तिक कामगिरी ही जितकी महत्त्वाची असते त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा संघाचा विजय असतो.
यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत कोणता फलंदाज किती धावा करतो यापेक्षा त्याच्या संघाने किती विजय मिळवले यावर तुमचे यश मोजले जाते. तुम्ही शतक फटकावले मात्र, तुमचा संघ पराभूत झाला तर तुमच्या शतकी खेळीला काहीही अर्थ उरत नाही, असेही गंभीरने म्हटले आहे.
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत नेदरलँड्स आणि श्रीलंकेविरुद्धचे पहिले दोन सामने जिंकून पाकिस्तानने हैदराबादमध्ये त्यांच्या विश्वचषक मोहिमेची जोरदार सुरुवात केली. मात्र, 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानचा संघ सध्या बेंगळुरूमध्ये आहे. 20 ऑक्टोबरला हा संघ एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
कर्णधार बाबर आझम याने विश्वचषक स्पर्धेत तीन सामन्यात मिळून एकूण 65 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने भारताविरुध्द 50(48), नेदरलॅड्सविरूध्द 05(18) आणि श्रीलंकेविरूध्द 10(15) धावांची खेळी केली आहे.