Ajit pawar – कधी एकदम चांगला भाव मिळतो तर कधी एकदम रस्त्यावर फेकण्याची वेळ येते. मात्र काही वेळा मागणी आणि पुरवठा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. पाऊस काळ कसा आहे, यावर भाव अवलंबून असतात.
अशा पद्धतीने कांदे-टोमॅटो रस्त्यावर फेकून प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांनी सबुरीने भूमिका घेणे आवश्यक आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी व्यक्त केले.
नाशिक दौऱ्यावर आज अजित पवार हे शेतकरी सन्मान मेळाव्यात बोलत होते. कळवणला येण्यापूर्वी अजित दादांनी सप्तशृंगी गडावर जात सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले.
अजित पवार म्हणाले, कांदा निर्यात शुल्कावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. हे निर्यात शुल्क काढून टाकले पाहिजे, याबाबत सबुरीने भूमिका घेणे आवश्यक आहे, अशी सर्वांची भावना आहे. कारण शेतकऱ्यांना त्यामुळेच दोन पैसे अधिकचे मिळतात.
एखाद्या पिकाला चांगला भाव मिळाला की सर्व शेतकरी त्याच पिकाची लागवड करतात. परिणामी पिकाचा पुरवठा वाढला की भाव घसरतात. शेतमाल रस्त्यावर फेकल्याने घसरलेले भाव वाढणार नाहीत,
हे जे काही ग्राहक आणि उत्पादक याचा जो ताळमेळ साधला गेला पाहिजे. तसेच सरकार तुमच्यासोबत आहे, शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सप्तशृंगी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत बैठक होणार असून आजच्या दिवशी शब्द देतो की, सोमवारी 81 कोटी 86 लाखाचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झालेल्या तुम्हाला सगळ्यांना वाचायला मिळेल.
शेतकऱ्यांनी अडवला ताफा !
राज्यात कांदा आणि टोमॅटोचे दर कोसळले आहेत. यामुळे राज्यभरातील शेतकरी संतप्त असून या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाहन ताफा दिंडोरी-कळवण रस्त्यावर अडविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला.
परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून काही जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र काही काळ रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला. शेतकऱ्यांनी थेट टोमॅटो-कांदे रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध नोंदविला आहे.