नगर – मनपा कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चाकरून विविध मागण्यासाठी शिष्टाई केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेले लेखी पत्र आ. जगताप यांनी मनपा युनियन अध्यक्ष अनंत लोखंडे यांच्याकडे सोपविले. मंगळवार (दि.10) रोजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या समावेत बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी लॉगमार्च मागे घेण्यात आला.
गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेत शुकशुकाट असल्याने अनेक कामे खोळंबली होती. शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला. आरोग्य, अग्निशामक आणि पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी वगळता सर्व कर्मचारी संपावर होते. दि,17 ऑक्टोबरला मंत्रालयावर हा लॉंगमार्च धडकणार होता. या लॉंगमार्चचा मुक्काम मंगळवार (दि.3) भाळवणी येथे होता. लॉंगमार्च सुरू असतानाच आ. जगताप मुंबईत मंत्रालयात कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनपाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी आ.जगताप यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत चर्चा केली.
मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना अखेर यश आले असून बुधवार (दि.4) रोजी सकाळी आ. जगताप यांनी लॉंगमार्चसाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची भाळवणीत भेट घेतली. मुंबईत झालेल्या घटनाक्रमाची माहिती देत सरकारने दिलेल्या आश्वासनाबाबत ची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचविली. उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेले लेखी पत्र देत आ. जगताप यांनी लोखंडे यांच्याकडे दिली. त्यावेळी लॉंगमार्च मागे घेत असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
शहरात अनेक कचऱ्यांचे ढिग
नगरकरांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाकडून रस्ते सफाईसाठी पर्यायी यंत्रणा उभी केली. या यंत्रणेने आज काही ठिकाणी रस्त्यांची सफाई केली मात्र कचरा उचलून घेण्यासाठी अनेक ठिकाणी गाड्या आल्या नाहीत. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी रस्ते चकाचक दिसत असले तरी आजूबाजूला मात्र कचऱ्याचे ढीग दिसत होते.