मंचर : पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांना झालेल्या धक्काबुक्कीशी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कुठलाही संबंध नसून, बांगर यांनी प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करू नये, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका प्रमुख विष्णू काका हिंगे पाटील यांनी दिला.
पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सबंध मंत्री वळसे पाटील आणि राष्ट्रवादी पक्षावर केला आहे. याबाबत खुलासा देण्यासाठी मंचर (ता. आंबेगाव, येथे सोमवारी (दि.2) आयोजित पत्रकार परिषदेत विष्णूकाका हिंगे पाटील बोलत होते. यावेळी महिला अध्यक्षा सुषमा शिंदे उपस्थित होत्या.
यावेळी हिंगे पाटील म्हणाले, प्रभाकर बांगर यांना झालेली धक्काबुक्की ही त्यांच्या वैयक्तिक कारणावरून झालेली असावी. त्यांना 10-12 लोकांनी अर्धा तास मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अर्धा तास मारहाण झाल्यानंतर त्या व्यक्तीला मोठ्या जखमा होतात, कपडेही फाटतात; परंतु तसे काही झाले नसल्याचे दिसून येते.
बांगर यांनी याबाबत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादीवर आरोप केले असून, या प्रकरणाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. गेल्या 35 वर्षांपासून वळसे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास झाला आहे, त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. प्रभाकर बांगर वाटेल ते आरोप करतात.
बांगर यांच्या वागण्याने जनतेत प्रक्षोभ निर्माण झाला आहे. त्याची परिणती उद्रेकांमध्ये होऊ शकते. त्यामुळे बांगर यांनी तोंडाला लगाम घालावा. त्यांनी आंदोलन करताना लोकशाहीच्या मार्गाने करावे. वाटल्यास त्यांनी स्वतःसाठी पोलीस संरक्षण घ्यावे, असे आवाहनही हिंगे पाटील यांनी केले. या प्रकाराची पोलिसांनी सखोल चौकशी करावी,असेही विष्णूकाका हिंगे पाटील यांनी म्हटले आहे.