पुणे – पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन भक्तीमय वातावरणात करण्यात आले. आज गुरुवारी (दि. 28 सप्टेंबर) मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणुक सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु झाली होती तर सायंकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी विसर्जन झाले. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणुक सकाळी 11 वाजता सुरु झाली होती तर विसर्जन सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी झाले. मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीची मिरवणुक दुपारी 12 वाजता सुरु झाली तर विसर्जन सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी झाले.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची मिरवणुक दुपारी 1 वाजता सुरु झाली तर विसर्जन सायंकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी झाले. तसेच मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीची मिरवणुक दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी सुरु झाली आणि वसर्जन सायंकाळी 6 वाजून 59 मिनिटांनी झाले. यावेळी वरूणराजानेही हजेरी लावल्याने भक्तांचा आनंद द्विगुणीत झाला होता. सगळीकडे गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…गणपती चालले गावाला.. चैन पडेना जीवाला.. गणपती बाप्पा मोरया..अशा घोषणा सर्वच गणेश भक्तांच्या मुखातून बाहेर पडत होत्या. ढोल ताशांच्या गजराने अवघी पुण्यनगरी दुमदुमन गेली. पुणे महापालिकेच्या डेक्कन येथील हौदात विसर्जन करण्यात आले.
पुण्याचा गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. गणेशोत्सव आला की पुण्यातील रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून जातात. विद्युत रोषणाई, मानाच्या गणपतींचा थाट, मिरवणुकांची डोळे दिपवणारी आरास, पारंपरिक वाद्यांचा गजर, कुठे मोदकाची लगबग तर कुठे सुरेल आरतीचा गजर.. असा हा दैदिप्यमान सोहळा गेली 10 दिवस पुण्यासह राज्यभरातून तसेच देश-विदेशातून आलेल्या गणेशभक्तांनी अनुभवला. आज बाप्पाला निरोप देण्याचा दिवस.. सकाळी साडेदहा वाजतापासून मानाच्या गणपतींच्या मिरवणुकींना सुरुवात झाली. क्रमाक्रमाने सायंकाळी मानाच्या पाचही गणपतींचे मोठ्या भक्तीभावात जल्लोषात विसर्जन झाले.
आज विसर्जनाच्या दिवशी पुणे शहरातील ऐतिहासिक गणेशोत्सव मिरवणुक पाहण्यासाठी सकाळपासूनच पुण्यासह जिल्ह्यातील भाविकांनी शहरात गर्दी केली होती. राज्यासह देश-विदेशातूनही मोठ्या प्रमाणात भाविक मिरवणुक पाहण्यासाठी आले आहेत. सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान पावसानेही हजेरी लावली. अंगावर पावसाच्या सरी झेलत ढोल-ताशांचा गजर सुरु होता. सगळीकडे गुलाल उधळला जात होता. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या…चा गजर सुरु आहे.
पुण्यातील मुख्य पेठांमधील रस्ते हे गणेश भक्तांनी तुडुंब भरले आहेत. गेली 10 दिवस पुणे शहरात गणपती उत्सवानिमित्त भक्तीमय वातावरण तयार झाले होते. आज बाप्पाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रु तरळत होते. मानाच्या पाच गणपती विसर्जनानंतर आता इतर गणपती विसर्जनासाठी सज्ज आहेत. मोठ्या जल्लोषात मिरवणुका सुरु असून क्रमाक्रमाणे आता इतर गणपतींचे विसर्जन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रात्रभर मिरवणुका असणार आहेत. शेवटचा गणपती विसर्जनासाठी उद्याची सकाळ उजाडणार असल्याचे बोलले जात आहे.
मानाचा पहिला गणपती – कसबा गणपती
कसबा गणपती हा पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो, मानाचा पहिला गणपती म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे. शनिवारवाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्तीत कसबा पेठ येथे कसबा गणपतीचे पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराला 1400 वर्षांचा इतिहास आहे. ही मूर्ती स्वयंभू असून, साडेतीन फूट उंचीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे, असे म्हटले जाते. 1893 साली कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ कसबा गणपतीपासूनच होतो.
मानाचा दुसरा गणपती – तांबडी जोगेश्वरी गणपती
तांबडी जोगेश्वरी हा पुण्यातील मानाचा दुसरा गणपती आहे. भाऊ बेंद्रे यांनी बुधवार पेठेतील या गणेशोत्सवाला सुरुवात केली. हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्तीत आहे.
मानाचा तिसरा गणपती- गुरुजी तालीम गणपती
गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्यातील मानाचा तिसरा गणपती आहे. मंडपातच गणेशोत्सव साजरा केला जातो.विशेष म्हणजे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधीच 1887 साली या गणपतीचा उत्सव सुरू झाला.
मानाचा चौथा गणपती -तुळशीबाग गणपती
तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा चौथा गणपती आहे. दक्षित तुळशीबागवाले यांनी 1900 साली या गणेशोत्सवाला सुरुवात केली. पुण्यातील हलत्या देखाव्यांची सुरुवात श्री तुळशीबाग गणपती मंडळाने केली. हा गणपती त्याच्या उंचच्या उंच मूर्तीसाठी ओळखला जातो.
मानाचा पाचवा गणपती – केसरी वाडा गणपती
केसरी वाडा गणपती पुण्यातील मानाचा पाचवा गणपती आहे.1894 पासून केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेने हा गणेशोत्सव सुरू केला. 1905 पासून टिळक वाड्यात केसरी या संस्थेचा उत्सव होऊ लागला. मानाच्या पहिल्या चारही गणपतींच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरूनच जाते. मात्र, केसरी वाड्याचा गणपतीची मूर्ती केळकर रस्त्यावरून जाऊन विसर्जित होते.