मुंबई : राज्यात सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील मागील काही दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यावरून विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. त्यातच शरद पवारांनी जरांगे पाटील यांची जालन्यात जाऊन भेट घेत सरकारवर टीका केली होती. त्याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती मोर्चाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
शरद पवार लढाऊ नव्हेतर पाठीत खंजीर खुपसणारे सेनापती आहेत, त्यांनीच मराठा समाजाची माती केल्याचे खोत यांनी म्हटले आहे. पवारांनी आता थांबावे, आणि आम्ही मराठे त्याची वाट बघत असल्याचे खोत म्हणाले. सध्या मराठा आरक्षण प्रश्नावरून सामाजिक आणि राजकीय वातावरण सर्वदूर तापले असताना, याच मुद्द्यावरून सदाभाऊंनी खासदार शरद पवार यांच्यावर हल्लाबोल चढवल्याने पवार समर्थक नेते आणि सदाभाऊंमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील आघाडी सरकारची सत्ता देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे शरद पवार आज एका ब्राह्मण नेतृत्वावर मराठा आरक्षणाचे खापर फोडत आहेत अशी टीकाही सदाभाऊंनी केली.मराठा समाजाला आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्टपणे सांगणारा सन २००४ मधील बापट आयोग का स्वीकारला? पुढे गायकवाड आयोगाने मराठा समाज मागास असल्याचे पुरावे गोळा केले आणि त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण मिळाले.
पण, राज्यातील आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनीच जाणीवपूर्वक मराठा समाजाचे आरक्षण घालवले असा सरळसोट आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. मराठा समाजाची माती करणाऱ्या पवारांनी हे पाप फेडण्यासाठी आता आझाद मैदानात उपोषण करावे असा टोला त्यांनी लगावला.