जळगाव – भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी घेण्याबाबत शरद पवार आपल्याला सांगत होते. मात्र, आपण त्यावेळी त्यांचे एकले नाही, ही आपली मोठी चूक झाल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे.
तसेच, या चुकीमुळे आपली पाच वर्ष वाया गेल्याची कबुली एकनाथ खडसेंनी दिली. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते जळगावमध्ये बोलत होते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी घ्या असे शरद पवार यांनी आपल्याला सांगितले होते. भाजपमध्ये असताना 2019 मध्ये पक्षाने मला तिकीट दिले नाही. त्यामुळे माझी पाच वर्ष वाया गेल्याचे खडसे म्हणाले.
इतकी वर्ष भाजपचा विस्तार करण्यात घालवली होती. त्यामुळे पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात येत नव्हता. मी संभ्रम अवस्थेत होतो असेही खडसे म्हणाले. दरम्यान, एकनाथ खडसेंच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.