Maharashtra Rain: संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. यावर्षी पावसाने ओढ दिली असल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता काही ठिकाणी पाऊस होत असल्यामुळे शेती पीकांना थोडासा दिलासा मिळत आहे. तर बहुतांश ठिकाणी अजूनही पावसाने हजेरी लावली नाही.
हवामान विभागाने शनिवारी राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार काही भागात पाऊस झाला मात्र बहुतांश कोरडेच वातावरण होते. तसेच हवामान विभागाने पुढील पाच दिवस अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मराठवाडा, विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
उद्या रविवारी देखील राज्यातील काही भागात पाऊस होईल. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत ठिकठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. बीड, हिंगोली, परभणी, जालना जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांनाही काही भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुढील पाच दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. परंतु राज्यात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. या अंदाजामुळे राज्यात दुष्काळाचे संकट कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होईल. दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढेल; परंतु पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहील, असा अंदाजही भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरूवारी (दि. 31) जाहीर केला आहे.