मुंबई – जालन्यात मराठा आंदोलकांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. आंदोलनासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात पोलीस घुसले आणि त्यांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेच्या निषेदार्थ संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजीराजे,उदयनराजे,शरद पवार अशा अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलन कर्त्यांची विचारपूस केली. तर तुम्हाला इंडिया आघाडीवर टीका करायला वेळ आहे परंतु एकाही मंत्र्याला जालन्यातील आंदोलकांना भेटण्यासाठी वेळ मिळाला नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली.
“राज्यात आंदोलन सुरू असून, माता-भगिनी उपोषणाला बसले आहेत, मात्र कोणाकडेही वेळ नाही. ‘इंडिया’ची पत्रकार परिषद सुरू असताना एका ‘उप’ने पत्रकार परिषद घेतली असा टोला देखील यावेळी ठाकरेंनी लगावला. तसेच “मी जालन्याला जाणार आहे. शुक्रवारी जालन्यात शासकीय अत्याचार झाला. याचा फक्त निषेध करून चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने सरकारवरती ताशेरे मारले आहेत. सरकार म्हणजे नेमकं कोण? पाहिलं तर ‘एक फुल, दोन हाफ’ आहेत असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“तुम्हाला ‘इंडिया’च्या विरोधात बोलायला वेळ आहे. मात्र, एकाही मंत्र्यांला आंदोलकांना भेटण्यास वेळ मिळाला नाही. एक फुल दोन हाफ’मधला एकही गेला नाही. प्रत्येक मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना राज्यात काय चालू आहे, याची कल्पना दिली जाते. एक फुल दोन हापला हे आंदोलन सुरु असल्याची माहिती नव्हती का? बारसूला मारहाण झाली, वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. आता जालन्यात लाठीहल्ला झाला आहे. असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
नेमकं काय घडलं जालन्यात
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाचं आरक्षणासाठी उपोषण सुरू होतं. तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे आंदोलनस्थळी गोंधळ उडाला. लाठीचार्जची बातमी समोर येताच राज्यभरातुन संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली.आंदोलकांवर लाठीचार्ज करतानाचे पोलिसांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावेळी आंदोलकांकडून दगडफेक झाल्याचा आरोप देखील पोलिसांकडून करण्यात आला आहे.