पाटणा :- राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव यांना केंद्रात सत्ता असलेल्या लोकांकडून तपास यंत्रणांचा वापर करून विनाकारण त्रास दिला जात आहे असा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला आहे.
लालूंना चारा घोटाळा प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर जवळपास दीड वर्षांनी लालू प्रसाद यादव यांचा जामीन रद्द करण्यासाठी सीबीआयने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी हा आरोप केला आहे.
सध्याची राजवट कोणालाहीं विनाकारण त्रास देत आहे, कोणालाही सोडले जात नाही. लालूंना जामीन मंजूर होऊन दीड वर्षांनी त्या जामीनाला विरोध करण्यासाठी अर्ज केला गेला आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
याच संबंधात बोलताना राजदचे नेते व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की निवडणुकीपर्यंत त्यांचे असेच प्रकार सुरू राहणार आहेत. त्यांना सर्वात मोठी भीती बिहारची आहे. त्यामुळे त्यांना हा प्रकार करावा लागत आहे, असे तेजस्वी यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आम्ही आमची बाजू न्यायालयात मांडू. त्यांनी आम्हाला कितीही त्रास दिला तरी यातून काहीही होणार नाही. आम्ही काय करणार ते आमच्या बाजूने स्पष्ट आहे, असे तेजस्वी म्हणाले. त्यांना कोणीही घाबरत नाही आणि त्यांच्यापुढे कोणीही झुकणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.