पुणे – समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बसविण्यात येणाऱ्या पाणी मीटरचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षांपासून पुणेकरांना मीटरद्वारे पाणीपट्टी आकारली जाण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत शहरात सुमारे 2 लाख 88 हजार मीटर बसविण्यात येणार असून, आतापर्यंत 1 लाख 27 हजार मीटर बसविण्यात आले आहेत. उर्वरित मीटर बसवण्यासाठी दहा पथके नेमण्यात आली असून, दररोज 400 ते 500 मीटर बसविण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरूरुद्ध पावसकर यांनी दिली.
महापालिकेकडून शहरात समान पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे 2,525 कोटी रुपयांची योजना राबविण्यात येत आहे. त्या अंर्तगत 2 लाख 88 हजार पाणी मीटर बसविणे, 83 नवीन पाण्याच्या टाक्या बांधणे तसेच 1,600 किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. 2017 मध्ये या योजनेचे काम सुरू झालेले असले, तरी करोनामुळे दोन वर्षे तसेच इतर काही प्रशासकीय मान्यतांसाठी हे काम रखडले होते.
मीटरची संख्या 40 हजारांनी घटली
महापालिकेने या योजनेसाठी केलेल्या प्रकल्प आराखड्यात सुमारे 3 लाख 18 हजार पाणी मीटर गृहीत धरत त्यानुसार नियोजन केले होते. त्यावेळी या योजनेत अर्धा ते पाऊण इंची नळजोडासाठी मीटर गृहीत धरण्यात आलेला होता. मात्र, आता प्रशासनाने फेरसर्वेक्षण केल्यानंतर काही नळजोड एकत्र करून मीटर बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
परिणामी, मीटरची संख्या 40 हजारांनी घटली असून आता महापालिकेस 2 लाख 88 हजार मीटरच आवश्यक आहेत. तर, बाजारात मायक्रो चिपचा तुटवडा असल्याने महापालिकेस मीटर मिळण्यातही अडचणी येत होत्या. मात्र, आता मीटर वेळेत मिळत असल्याने हे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याचा दावा पावसकर यांनी केला आहे.
पुढच्या वर्षी मीटरद्वारे पाणी
शहरात लाखापेक्षा अधिक पाणीमीटर बसवले असले, तरी सध्या मिळकतकरात समावेश करून पाणीपट्टी आकारली जात आहे. मात्र, शहरात 100 टक्के पाणी मीटर बसवल्यानंतर मीटरद्वारे पाणीपट्टी वसूल केली जाणार आहे. सध्या मीटर बसवल्याने कोणत्या भागात, कोठे किती पाणी दिले जात आहे हे लक्षात येत असून, पालिकेस पाण्यावर नियंत्रण आणणे शक्य होत आहे. ज्या ठिकाणी मीटर दिला आहे, तेथे प्रती व्यक्ती दिलेले जाणारे पाणी आणि त्यापेक्षा अधिक वापर असल्यास त्यावर पाणीपट्टी आकारण्याचे नियोजन आहे. यासाठी महापालिकेने आधीच पाणीपट्टी दुप्पट केलेली आहे.