पुणे – सातबारा उताऱ्यावर वारसनोंद करण्यासाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. नागरिकांना घरबसल्या या नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा महसुल विभागाने उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी ई हक्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.
भूमी अभिलेख विभागाने अधिकाधिक सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. डिजिटल सातबारा उतारा, ई फेरफार अशा प्रमुख सुविधांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांना सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाऊ लागू नये, यासाठी डिजिटल सातबारा उपलब्ध करून दिला आहे. आता याच्या पुढील पाऊल म्हणजे कोणत्याही कामासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, अशी शासनाची भूमिका आहे. त्यानुसार वारसनोंदीची सुविधा आता ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक ऑगस्टपासून राज्यात ही सुविधा लागू करण्यात आली आहे.
यापूर्वी वारसनोंदीसाठी तलाठी कार्यालयात जाऊन नागरिकांना अर्ज करावा लागत होता. आता हा त्रास वाचणार आहे. मयत व्यक्तीनंतर त्यांच्या वारसाची नोंद घेण्यासाठी नागरिकांना महाभूमि या संकेतस्थळावर अथवा pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
हा ऑनलाइन अर्ज संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे जाईल. तलाठी या अर्जांची ऑनलाइन पडताळणी करतील. कागदपत्रे अपूर्ण असेल तर त्याची माहिती अर्जदाराला मेलद्वारे कळविण्यात येईल. सर्व कागदपत्रे पूर्ण असतील तर तलाठी त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर घेणार आहे..
इतर सुविधाही लवकरच…
एक ऑगस्टपासून राज्यात वारसनोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील टप्प्यात कर्जाचा बोजा दाखल करणे, अथवा कमी करणे, एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे आदी सुविधांसाठी ई हक्क प्रणालीतून सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी सांगितले.