नवी दिल्ली – मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहेत. त्यामुळे गदारोळ होऊन संसदेचे कामकाज ठप्प झाले होते. अशात कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी आपचे नेते संजय सिंह यांना पाठिंबा दर्शवला. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील कटूता जवळपास संपल्याचे मानले जात आहे.
सोमवारी राज्यसभेत गदारोळ झाल्याने आपचे खासदार सिंह यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी त्या सभागृहातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर कारवाईच्या निषेधासाठी सिंह यांनी संसदेच्या आवारातच निदर्शन करण्याचे सत्र आरंभले आहे. त्यांना विरोधी पक्षांची साथ मिळत आहे. अशात काल संसदेत दाखल होण्याआधी सोनियां गांधींनी सिंह यांची भेट घेतली.
आमचा पाठिंबा तुम्हाला आहे, अशी ग्वाही सोनियांनी त्या भेटीत दिली. नव्याने स्थापन झालेल्या इंडिया या विरोधकांच्या आघाडीत कॉंग्रेस आणि आप हे पक्षही सहभागी झाले आहेत. मात्र, विविध मुद्द्यांवरून त्यांच्यात कटूता असल्याचे दिसून येत होते.
दिल्ली अध्यादेशाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस पक्ष आपच्या पाठिशी उभा राहिल्याने त्यांच्यातील दुरावा संपण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली. आता सोनियांच्या कृतीने दोन्ही पक्षांमधील जवळीक वाढल्याचे स्पष्ट होत आहे.