पुणे – कारागृहातील रक्षकाने गोळी झाडून आत्महत्या प्रकरणाचे कारण उघडकीस आले आहे. घटनेच्या आठवडाभरापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. पण, हे लग्न केल्याप्रकरणी पूर्वाश्रमीच्या प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर दबाव आणणे सुरू केले होते. यातून त्यांनी येरवडा कारागृहात दि. 27 फेब्रुवारी रोजी गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी प्रेयसीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमोल मुरलीधर माने (वय 28) असे या कारागृह रक्षकाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी एक युवती (रा. येरवडा) दिनकर धुमाळ (57, रा. विजय पार्क, विद्यानगर), प्रतीक धुमाळ, रोहिदास निगडे (52), सोहम निगडे, रोहित साहु लॅबवाला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल आणि एका युवतीचे प्रेमसंबंध होते.
तिने त्याच्यासोबत लग्नास नकार दिला होता. त्यानंतर अमोलला ही युवती आणि नातेवाईकांनी धमकावण्यास सुरुवात केली. दरम्यान, अमोलचा जानेवारी-2023 मध्ये अन्य युवतीशी विवाह झाला. तेव्हा पूर्वाश्रमीची प्रेयसी आणि तिच्या नातेवाईकांनी त्याला पुन्हा धमकावण्यास सुरुवात केली. बदनामीची भीती दाखवत पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी त्याला दिली. त्यानंतर 27 फेब्रुवारीच्या पहाटे अमोल यांनी आत्महत्या केली होती. त्यापूर्वी त्याने मोबाइलवर संदेश लिहिला होता. पोलीस निरीक्षक कांचन जाधव तपास करत आहेत.