जळगाव – इर्शाळवाडी येथील दुर्घटनेत अनेकांनी आपल्या कुटुंबियांना गमावले.इर्शाळवाडीमध्ये शनिवारी तिसऱ्या दिवशीही शोध आणि बचाव मोहीम सुरूच आहे. बुधवारी रात्री येथे दरड कोसळल्याची घटना घडली होती. तेव्हापासून या ठिकाणी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.आतापर्यंत या दुर्घटनेत फक्त 22 ते 24 लोकांचे मृतदेह हाती आले असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या दुर्घटनेबाबत भाष्य केलं.
जेसीबी, ट्रॅक्टरसारखी मशिनरी त्या ठिकाणी पोहचू शकत नाही. त्यामुळे हातानेच कुदळ फावड्याने माती कोरून मृतदेह शोधावे लागत आहेत. हे गाव दुर्गम भागात असल्यामुळे बचावकार्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. तसेच या ठिकाणचा मृतांचा आकडा हा दुर्दैवाने तीन आकडी असू शकतो, अशी भीतीही मंत्री महाजन यांनी यावेळी व्यक्त केली.
अनेक घरच्या घर या ठिकाणी मातीच्या ढीगाऱ्याखाली गाडली गेलेली आहेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून सर्वोतपरीने मदत कार्य सुरु आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील तळीये या ठिकाणी ज्याप्रमाणे काही दिवसांनी मृतदेहांचं शोधकार्य थांबवून पंचनामे करण्यात आले होते. त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील करावं लागू शकत, असेही गिरीश महाजन म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे स्वीकारणार पालकत्व
इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. ‘ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत.’
‘शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. दोन वर्षांपासून १४-१५ वर्षांपर्यंतची मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे.’हीच बाब लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे.