दीड महिन्यांपासून नागरिकांसह, कर्मचाऱ्यांचा मनस्ताप वाढला
पुणे – पुणे स्टेशन येथील मध्यवर्ती शासकीय इमारतीत (सेंट्रल बिल्डिंग) विविध महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. या इमारत व इमारतीच्या आवारातील विविध मोबाईल कंपन्याचे मोबाईल नेटवर्क दीड महिन्यापासून “गुल’ झाले आहे. यामुळे नागरिकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सेंट्रल बिल्डिंग ही ऐतिहासिक वारसा असलेली इमारत आहे. या इमारतीत व आवारात महत्त्वाची कार्यालये आहेत. नागरिक, पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्था व संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हे कार्यालयात कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त सतत भेट देत असतात. मागील काही वर्षांपासून लॅंडलाईन फोनपेक्षा मोबाईलच्या फोनचे जाळे अधिक विस्तारले आहे.
कार्यालयात येण्याऐवजी मोबाईलवरुन नागरिकांना आपापल्या कामांचा पाठपुरावा करणे सोयीचे ठरते. मात्र, सेंट्रल बिल्डिंगमधील बहुसंख्य कार्यालयात कुठल्याही कंपनीचे मोबाईल नेटवर्क सुरळीत चालत नाही.
नेटवर्क सुरळीत नसल्याने तातडीच्या वेळी अधिकारी, कर्मचारी यांच्यात संभाषण करण्यात अनंत अडचणी येत असून त्याचा कामकाजावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. नागरिकांना कामकाजाचा पाठपुरावा करण्यासाठी पैसा व वेळ खर्च करून प्रत्यक्ष कार्यालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. यामुळे कार्यालये गर्दीने गजबजू लागलेली आहेत.
दरम्यान शासकीय यंत्रणेचे कामकाज गतिमान होण्यासाठी मोबाईल नेटवर्कच्या अडचणीचे निराकरण करावे, अशा मागणीची पत्रे शिक्षण आयुक्तालयासह अन्य कार्यालयांनी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिलेली आहेत. मात्र, तरीही अद्याप तिढा काही सुटलेलाच नाही. विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार (दि.17) पासून सुरू होणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण माहिती शासनाला पाठवावी लागते. मोबाईल नेटवर्कची मोठी अडचण असल्याने अधिकाऱ्यांना आता सेंट्रल बिल्डिंगच्या बाहेरील जागांचा तात्पुरता शोध सुरू करावा लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
भाडे थकविल्याने मोबाईल टॉवरचे कनेक्शन बंदच
सेंट्रल बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या एका इमारतीवर तीन मोबाईल कंपन्याचा एक टॉवर बसविण्यात आलेला आहे. संबंधित कंपन्यांनी टॉवरचे सहा महिन्यापासूनचे भाडे थकविले आहे. वारंवार सूचना देऊनही कंपन्यांनी भाडे भरण्यास टाळाटाळ केली आहे. अखेर संबंधित इमारतीच्या संस्थेने टॉवरचे कनेक्शनच बंद करुन टाकले आहे. भाडे भरल्याशिवाय कनेक्शन सुरूच करणार नाही, असा पवित्रा संबंधित संस्थेने घेतला आहे. मोबाईल टॉवरचे कनेक्शनच बंद करुन ठेवल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील सर्वच कार्यालयातील मोबाईल नेटवर्कच गायब झाले आहे.