मुंबई : शहांनी शब्द फिरवला आणि आज त्यांच्या जुन्या कार्यकर्त्यांवर आयात नेत्यांच्या कार्यक्रमात सतरंज्या उलचण्याची वेळ आली, अशी टीका विदर्भ दौऱ्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावरून भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करून ठाकरेंंवर पलटवार केला आहे.
बावनकुळे यांनी म्हटले आहे की, खोटं बोल पण रेटून बोल हा उध्दव ठाकरे (uddhav thackeray) यांचा स्वभाव आहे. अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत मुख्यमंत्रीपदाबाबतची अडीच वर्षाची बोलणी झाली होती तर नरेंद्र मोदी (narendra modi), अमित शाह यांच्या प्रत्येक सभेत देवेंद्र फङणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होणार हे सांगितलं जात होतं. तेव्हा तुम्ही तोंडातून चकार शब्द काढला नाही.
तेव्हा युती करताना तुम्ही देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य केलं आणि निवडणुकीनंतर शरद पवारांनी हात पुढे केल्यावर भाजपसोबत गद्दारी केली. मतदान युती म्हणून मागितलं आणि सत्ता मात्र काँग्रेस राष्ट्रवादीसोबत स्थापन केली. अर्थात गद्दारी करून मिळवलेली सत्ता तुम्हाला टिकवता आली नाही. आणि आता खोट्या शपथा घेऊन थापा मारत आहात. अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असे तुम्ही सांगायचे. पण हे पद तुम्ही स्वतःच बळकावले. सोबत लहान मुलाला मंत्री केलं आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी म्हणत सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं. त्याचवेळी तुमचा खोटारडेपणा महाराष्ट्रानं बघितला. आता ही जनता तुमच्या खोट्या शपथा आणि थापांना बळी पडणार नाही, असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांंनी म्हटले आहे.
काय म्हणाले होतेे उध्दव ठाकरे…
भाजप नेते अमित शहांनी शब्द पाळला असता तर भाजप आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्षे सत्तेत असते. मात्र, शाहांनी शब्द फिरवला आणि आज त्यांच्या जुन्या कार्यकर्त्यांवर आयात नेत्यांच्या कार्यक्रमात सतरंज्या उलचण्याची वेळ आली आहे.