गावागावांत वीजबिल, कर्मचारी, देखभाल दुरुस्ती कोण करणार?
मंचर – सध्या अनेक गावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून जलजीवन नळ योजनेचे काम धडाकेबाज सुरू आहे; परंतु भविष्यात ग्रामपंचायतीने जलजीवन नळ योजना चालवायची कशी, वीजबिल, कर्मचारी, देखभाल दुरुस्ती, करायची कशी, हा प्रश्न गावोगावाच्या स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांमध्ये निर्माण झाला असून, त्यांच्यात याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक गावोगावी जलजीवन योजनेचे काम सुरू आहे. करोडो रुपये खर्च यासाठी केला जात आहे. 2053 पर्यंत गावांची होणारी वाढ आणि लागणारे पाणी याबाबतचे नियोजन या योजनेत करण्यात येत आहे. सध्या ग्रामीण भागात या योजना चालवायच्या कशा, याबाबत कुठलीही तरतूद किंवा नियोजन केलेले दिसून येत नाही, त्यामुळे देशभरात केंद्र सरकारच्या वतीने “हर घर, नल से जल’ हे ब्रीदवाक्य घेऊन जलजीवन मिशन योजनेंतर्गत विहिरी, पाइपलाइन, पाण्याच्या टाक्या यांची कामे सुरू आहेत.
ज्या भागात पाण्याची कमतरता आहे, त्या भागात योजना झाल्यानंतर विहिरीतील पाणी संपल्यानंतर करायचे काय, हाही प्रश्न उभा राहणार आहे, त्यामुळे करोडो रुपये खर्च करून केलेली योजना किती प्रमाणात यशस्वी होणार याबाबत मात्र ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे
वातावरण आहे.
गावात योजना होते याबाबत सरपंच, उपसरपंच, सदस्यांमध्ये उत्साह आहे. येणाऱ्या कालखंडात ही योजना केली याचे स्मरण ग्रामस्थांना राहील, या भूमिकेतून हे सर्व पदाधिकारी सध्या खुशीमध्ये असले तरी पुढील काळात यासाठी येणारा खर्च कुठून उभा करायचा, हाही प्रश्न सध्या ग्रामपंचायतीं पुढे आहे.
– विशाल करंडे, माजी उपसरपंच काठापूर
खासगी स्रोत असल्याने योजनेला नकार
काही गावांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणेसह ही योजना होत असल्याने त्या ठिकाणचा खर्च मोठा आहे, तर काही गावांमध्ये ग्रामस्थांकडे घरगुती खासगी पाण्याची उपलब्धता आहे. स्वतःच्या मालकीचे पाण्याचे सोर्स असतानाही हे पाणी आम्हाला नको अशी भूमिका ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
कमू उत्पन्नात योजना राबवणार कशी?
जुन्या नळ पाणीपुरवठा योजना पाहता या योजना सुरू ठेवणे ग्रामपंचायतींना अवघड जात आहे. कारण ग्रामीण भागात ग्रामपंचायतीला येणारे उत्पन्न अतिशय कमी असते. या उत्पन्नावर ग्रामपंचायतीचा होणारा खर्च पाहता नवीन होणाऱ्या पाणी योजनेसाठी कर्मचारी , देखभाल दुरुस्ती, वीजबिल याबाबत ग्रामपंचायतीने पैसे कुठून उभारायचे हाही प्रश्न ग्रामपंचायतीपुढे उभा राहिला आहे.