मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत सातारा आणि पाटण दौऱ्यावर आहेत. पाटण येथे संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शंभूराजे देसाई यांच्यवर सडकून टीका केली. संजय राऊत यांनी,’देशात मी म्हणजे सर्वस्व आणि मालक हे दिल्लीतही कधी चाललं नाही, तर गल्लीत काय चालणार. बाळासाहेब देसाई यांना लोकनेते का म्हणतात? याचा बालक, पालक आणि मालकांनी अभ्यास करण्याची गरज आहे. आम्ही आजही मुंबईत अनेक प्रसंगी बाळासाहेब देसाई यांचं उदाहरण देतो की नेता कसा असावा. म्हणून ते लोकनेते आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री शंभूराज देसाई यांना टोला लगावला आहे.
“येथे कोणीही मालक होऊ शकत नाही, कारण देशात लोकशाही आहे. ही लोकशाही दिल्लीत आणि पाटणलाही आहे. त्यामुळे अनेकदा आपण पराभूत झाला, जिंकलात आता परत पराभूत होणार आहे,” असा इशाराही संजय राऊतांनी शंभूराज देसाईंना दिला आहे.
“येथे राजेशाही नाही. राजांना सरकार म्हणण्याची पद्धत असू शकते. पण, राजांनाही लोकांतून निवडून येऊनच राज्य करावे लागते. मी म्हणजे सरकार आणि राज्य हा अहंकार वाढायला लागतो. तेव्हा लोक घरी पाठवतात. पाटणमध्ये ही वेळ आली आहे,” असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.
“आम्ही महाराष्ट्र आणि देशात फिरतो. आज पाटणला आहे, काल पाटण्यात होतो. महापालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं आव्हान शिवसेना आणि महाविकास आघाडीने दिलं आहे. निवडणुका घेतल्यास पश्चिम महाराष्ट्र काय महाराष्ट्रातील उद्रेक बाहेर पडल्याचं दिसेल,” असेही संजय राऊतांनी सांगितले.