पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत केंद्र प्रमुख पदाच्या भरतीसाठी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा जूनअखेर घेण्यात येणार होती. मात्र, काही शिक्षक व संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे तिढा निर्माण झाला आहे. यामुळे ही परीक्षाच पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात 4 हजार 860 केंद्र प्रमुखांची पदे मंजूर आहेत. यातील बरीचशी पदे मागील काही वर्षांपासून रिक्तच राहिलेली आहेत. 50 टक्के पदे पदोन्नतीने व 50 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यास राज्य शासनाने मंजूरी दिलेली आहे. प्रत्यक्षात 2 हजार 430 जागा उपलब्ध होण्याची आवश्यकता असताना 2 हजार 384 इतक्याच जागा भरतीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. आयबीपीएस या कंपनीमार्फत घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षेबाबत अधिसूचनाही जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी 15 जूनपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीत 33 हजार 400 शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी झाली.
जिल्हा परिषदांच्या तीन वर्षे अनुभव असलेल्या प्राथमिक शिक्षकांनाच ही परीक्षा देता येणार आहे. यातही परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्ष निश्चित करण्यात आली होती. या अटी व शर्तीत सवलत देण्याच्या दृष्टीने बदल करण्यासाठी काही शिक्षक, संघटनांनी उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद, नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या आहेत. यामुळे याचिकाकर्त्यांना ऑफलाईन अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली होती. यात 250 जणांनी अर्ज केले आहेत.
आता अर्ज करण्यासाठीची सर्व प्रक्रिया थांबविण्यात आलेली आहे. परीक्षा परिषदेने शासनाकडून मार्गदर्शन सूचना मागविल्या आहेत. मात्र, शासनाकडून त्यावर काहीच ठोस उत्तर अजूनही मिळालेले नाही. प्राथमिक शिक्षण संचालक हे नियंत्रण अधिकारी आहेत. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचनांप्रमाणे पुढील अंमलबजावणी करण्यासाठी परीक्षा परिषदेला वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान आता जुलैअखेरीस किंवा ऑगस्टमध्ये ही परीक्षा होण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे.
केंद्र प्रमुख पदाच्या भरतीसाठी जूनच्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन होते. उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय कारणास्तव परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध होईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त शैलजा दराडे म्हणाले.