पुणे – बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम कोकण, गोवा आणि मुंबई समुद्र किनाऱ्यांवर झाला असून, काल दुपारपासून लाटांची तीव्रता वाढली होती. किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊसही पडला.
लाटांची तीव्रता वाढल्याने पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच किनाऱ्यालगतच्या नागरिकांना काल दिवसभर सावधतेचा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान, राज्यात दाखल झालेला मान्सून तळ कोकणात रेंगाळला आहे. चक्रीवादळ पूर्णत: निवळल्यानंतर महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्यापासून अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे.
या कमी दाबाच्या पट्टामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीला गती मिळेल. असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान आज (शुक्रवारी) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वीजांच्या कडकडाटात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.