कोल्हापूर – वीजेच्या खांबावर काम करत असताना वीजप्रवाह अचानक सुरु झाल्याने अवघ्या 25 वर्षीय अमित प्रकाश माने या तरुण वायरमनचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील पळसंबेत येथे हा अपघात झाला.
महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, महावितरणच्या गगनबावडा उपविभागांतर्गत येणाऱ्या पळसंबेत अमित कंत्राटी वायरमन म्हणून काम करत होता.
बुधवारी दुपारी वीजपुरवठा दुरुस्त करण्यासाठी विजेच्या खांबावर चढला असतानाच विजेचा धक्का बसला. यानंतर अमितला उपचारासाठी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
अमितचा अवघ्या दोन दिवसांपूर्वी विवाह निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे भावी आयुष्याची स्वप्ने पाहत असताना त्याच्या दुर्दैवी मृत्यूने शोक व्यक्त केला जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडिल आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.