कात्रज -कात्रज येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, आमदार संजय जगताप, माजी आमदार योगेश टिळेकर एकाच व्यासपिठावर समोरा-समोर आल्याने नागरिकांनी या लोकप्रतिनिधींवर समस्यांचा भडीमार केला. नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देत या लोकप्रतिनिधींनी समस्यांचे निराकरण केले. तसेच, सर्व समस्या सोडविण्याबाबत ठोस आश्वासनही दिले.
कात्रज विकास आघाडीचे अध्यक्ष नमेश बाबर यांनी या जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांनी खंडित वीजपुरवठा, वाहतूक कोंडी, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, कायदा सुव्यवस्था, मुस्लिम दफन भूमीसाठीचा रस्ता, कात्रज- कोंढवा रस्त्याचा रेंगाळलेला प्रश्न, प्रसूती गृह, क्रिडांगण अशा विविध समस्या मांडल्या.
यावेळी माजी नगरसेविका अमृता बाबर, वाहतूक विभागाचे सहा. पोलीस आयुक्त मौला सय्यद, महापालिकेचे विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, माजी सरपंच विक्रम भिलारे, गणेश निंबाळकर सचिन मांगडे, अजित निंबाळकर, उदयसिंह मुळीक, पंचक्रोशीतील आजी-माजी सरपंच, उपसरपंच तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वराज बाबर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
15 वर्षांचा पाणीप्रश्न निकाली निघणार…
कात्रजकरांचे प्रश्न शंभर टक्के सुटतील. येत्या काही दिवसात वडगावच्या व्हीटीपी मधून 30 एमएलडी पाणी कोंढवा खुर्द-बुद्रुक व कात्रज परिसरासाठी सोडण्यात येईल. आयुक्तांशी याबाबत भेट घेतली. कात्रज गाव पंचक्रोशीतील असणारे तलाव खोलीकरण व रुंदीकरणासाठी प्राधान्य देत कामे लवकर पूर्ण करण्यात येईल. याकरिता अधिकाऱ्यांची नेमणुकही करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील पंधरा वर्षांचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.