संगमनेर – हिंदू समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला संगमनेरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 10 वाजता भगव्या मोर्चाला सुरुवात झाली. दिल्लीतील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण, देशभरात घडत असलेल्या लव्ह जिहादचे वाढते प्रमाण आणि जोर्वे रस्त्यावर आठ दिवसांपूर्वी दोन गटांत झालेला वाद याच्या विरोधात बंद पुकारण्यात आला होता. जवळपास 25 हजारपेक्षा जास्त हिंदू बांधव रस्त्यावर उतरून या मोर्चात सहभागी झाले. नंतर मोर्चाचे रूपांतर नवीन नगर रस्त्यावर सभेत झाले. मोर्चा आवरल्यानंतर घरी परतत असताना मात्र या मोर्चाला गालबोट लागल्याची संतापजनक घटना घडली.
मोर्चात नागरिकांच्या हातात असलेले वेगवेगळे फलक हिंदू समाजाचा आक्रोश दर्शवित होते. तरुणांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणांनी अवघे संगमनेर दुमदुमून गेले होते. नगरपालिकेपासून निघालेला हा मोर्चा बाजारपेठ, सय्यदबाबा चौक, मेनरोड, चावडी, मोमीनपुरामार्गे प्रशासकीय भवनाजवळ पोहोचला. नंतर या ठिकाणी सभा झाली. साडेबाराच्या सुमारास सभा उरकली आणि मोर्चेकरी घरी जायला निघाले. समनापूर गावातून मोर्चेकरी घरी जात असताना दोन गटांत शिवीगाळ होऊन दगडफेकीला सुरुवात झाली होती.
यात दुचाकी गाड्यांसह चारचाकी गाड्यांचेही नुकसान करण्यात आले. या हाणामारीत चार जण जखमी झाले. या घटनेनंतर समनापुरात काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्वतः तेथे धाव घेत जमाव पांगविल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या घटनेच्या उपलब्ध व्हिडिओवरून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. काही समाजकंटकांनी मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ केली. या वेळी काही टवाळांनी दगडं भिरकावल्याने शांततेत समारोप झालेल्या मोर्चाला गालबोट लागले.
मोर्चात सहभागी नागरिकांची संख्या खूप मोठी असल्याने सुरुवातीला दगडफेक झालेली वाहने थांबल्यानंतर पाठीमागून आलेली वाहनेही त्यामागे थांबू लागल्याने तेथे गर्दी झाली. त्यातून तणाव निर्माण होऊन मोर्चेकऱ्यांमधील काहींनी प्रत्युत्तरात तुरळक दगडफेक केल्याने त्यात समनापुरातील रईस बिलाल शेख, इस्माईल फकीर मोहंमद शेख, रशीदा हुसेन शेख व हुसेन फकीरमोहंमद शेख हे चौघे जखमी झाले आहेत. यासोबतच पाच वाहनांचेही नुकसान झाले आहे. हा प्रकार सुरू असताना काहींनी मोबाईलद्वारे त्याचे चित्रीकरणही केले आहे.