लंडन -भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवातीला शत्रुत्व तीव्र होते, वातावरणदेखील खूप तणावपूर्ण होते. पण ऑस्ट्रेलियात आम्ही दोनदा विजय मिळविल्यामुळे ऑस्ट्रेलिया आता भारताला कमी लेखत नाही. कसोटीमधीलच काय सर्वच प्रकारातील क्रिकेटमध्ये भारताला एक बलाढ्य संघ समजण्यात येते, हीच आमच्या दशकभरातील कामगिरीची फलनिष्पत्ती आहे, असे प्रतिपादन भारताचा आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने केले आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या 2018-19 आणि 2020-21 च्या सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला 2-1 अशाच फरकाने पराभूत केले आहे. त्यामुळे दोन्ही प्रतिस्पर्धी संघांत आदराची भावना असते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी मी नेहमीच प्रेरित असतो, कारण, ते क्वचितच त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी देतात, असेही कोहली म्हणाला.
भारताच्या माजी कर्णधाराच्या मते, अंतिम सामन्याचा निकाल परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या संघांसाठी सकारात्मक ठरेल. ओव्हलवर ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांनी संघर्ष केला आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या 38 कसोटी सामन्यांपैकी फक्त सात जिंकले आहेत, तर भारताने 14 सामन्यांपैकी फक्त दोन विजय मिळवले आहेत.
महत्त्वाच्या सामन्यात किती जबाबदारीने खेळावे लागते, याचे गांभीर्य शुभमन गिलकडे नक्की आहे. तो अव्याहतपणे खेळातील बारकावे, फलंदाजीचे तंत्र आणि प्रसंगानुरुप खेळ याविषयी बोलत असतो.
– विराट कोहली, भारतीय फलंदाज