विश्रांतवाडी -येरवडा, विश्रांतवाडी, विमानतळ, चंदननगर, लोणीकंद, खडकी आणि चतु:श्रृंगी अशा सात पोलीस ठाण्यात “निर्भय विद्यार्थी अभियान’ येत्या शैक्षणिक वर्षांपासून परिमंडळ चारमध्ये सुरू करण्यात येणार आहे. मुलींची छेडछाड थांबविणे, व्यसनमुक्ती, ताण-तणाव व्यवस्थापन, लैगिंक शिक्षण, मूल्यशिक्षणाचे धेडे स्थानिक स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, महिला व युवक मंडळांच्या मदतीने देणार असल्याची माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.
येरवडा पोलीस ठाण्यात झालेल्या स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीत बोराटे बोलत होते. यावेळी येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, माजी नगरसेविका सुलभा क्षिरसागर, पौर्णिमा गादिया, विवेक देव, डॉ. राजू आडागळे, निखिल गायकवाड उपस्थित होते.
बोराटे यांनी 2005 पासून सुरू असलेल्या व स्वयंसेवी संस्था राबवित असलेल्या निर्भय विद्यार्थी अभियानचे कौतुक करत म्हणाले की, शालेय वयातच मुलांना मुल्यशिक्षण व वैज्ञानिक दृष्टीकोन दिल्यास चांगले नागरिक घडू शकतात. सध्या, शहरात बालगुन्हेगारी, व्यसनाधिनता, बाल लैगिंक अत्याचाराच्या घटना वाढत आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रीत प्रयत्न करायला हवेत. व्यसनमुक्ती, चांगले संस्कार करण्याची गरज आहे. हे प्रयत्न शालेय स्तरावर झाल्यास त्यांचा चांगला परिणाम होऊ शकतो. यासाठी स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत असल्यामुळे सकारात्मक परिणाम होतील.
यावेळी बैठकीत मुक्तांगण, व्यसनमुक्ती केंद्र, सुराज्य सर्वांगिण विकास संस्था, दिशा, इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक दिलीप कुऱ्हाडे यांनी केले. बाळकृष्ण कदम यांनी आभार मानले.
शिक्षक व शिक्षिकांना प्रशिक्षण…
शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक शाळेतील शिक्षक व शिक्षिकांना “प्रेरक प्रशिक्षक’ म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये मूल्यशिक्षण, ताण-तणाव व्यवस्थापन, लैगिंक शिक्षण, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो), व्यसनमुक्ती आदींचा समावेश आहे. त्यामुळे शिक्षक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या समस्या सोडवविणार असल्याचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सांगितले.