पुणे – राज्यातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून घेण्यात आला आहे. यामुळे आता अधिकारी, कर्मचाऱ्यांना बदल्यांसाठी आणखी काही कालावधी वाट पाहावी लागणार आहे.
दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात. एकाच विभागात, कार्यालयात वर्षानुवर्षे काम करणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्याही खुप वाढली आहे. बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी सोयीच्या ठिकाणी बदल्यांसाठी प्रयत्न करत असतात. यंदाच्या वर्षी बऱ्याचशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना बदल्यांबाबतची आस लागली होती.
बऱ्याचशा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्णही झालेली आहे. दरम्यान काही विभागातील बदल्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती. 31 मे अखेर बदल्यांचे आदेश निघतील, अशी चर्चा सुरू होती. अचानक सामान्य प्रशासन विभागाच्या कक्ष अधिकारी विद्या भोईटे यांनी बदल्यांना येत्या जूनअखेरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे आदेशच जारी केले आहेत.
विनंती बदल्यांसाठीही अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली होती. काही विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही तयार झालेले होते. केवळ ते जाहीर करण्याचे काम बाकी होते. मात्र, आता बदल्याच लांबणीवर पडल्यामुळे नाराजी पसरल्याचे चित्रही निर्माण झालेले आहे.