सध्याचं युग हे नवकल्पनांचं (इनोव्हेशन) आहे असं म्हटलं जातं. अनेक प्रकारची नवनवीन उत्पादनं, सेवा उपलब्ध झाल्या असल्यानं स्पर्धा वाढली आहे. या अहमहमिकेतून नवकल्पनांना उभारी मिळत असते. जग उत्पादन आणि सेवा क्षेत्रात संपृक्त झाल्यानं नवकल्पनांशिवाय उद्योगांना टिकून राहणं अशक्य झालं आहे. याबाबत म्हटलं जातं- इनोव्हेट ऑर पेरिश. म्हणजेच एकतर नवकल्पना निर्माण करा नाही तर नाश पावा. खरोखरीच नवकल्पनांचा पुरस्कार केला नाही तर उद्योगांना तिलांजली मिळू शकते.
याचंच जीतं-जागतं उदाहरण ही सत्य घटना आहे. ईस्टमन कोडॅक ही छायाचित्रण व्यवसायातील अग्रगण्य कंपनी. या कंपनीनं अनेक वर्षांपूर्वी इलेक्रॉ रनिक (डिजिटल) कॅमेऱ्याचा शोध लावला. तंत्रज्ञानातील बदलांना नेहमीच विरोध होत असतो त्यानुसार त्यांच्या या नवीन कॅमेऱ्याला बाजारात अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कंपनीनं हा प्रकल्प गुंडाळून ठेवला.
पुढे इलेक्रॉवेनिक विश्वात मोठी क्रांती झाली आणि अनेकांनी डिजिटल कॅमेरे बाजारात आणले. तेव्हा पूर्वीच्या अपयशाचा अनुभव असल्यानं कोडॅक कंपनीनं त्याकडे दुर्लक्ष केलं. परिणामी कंपनीचं दिवाळं वाजलं! योग्य वेळी आपल्या प्रकल्पाला नवसंजीवनी देऊन उत्पादन बाजारात आणलं असतं तर कंपनी नुसती वाचलीच नसती तर ऊर्जितावस्थेत आली असती.
नवकल्पनांसाठी विद्वत्तेची आवश्यकता नसते. अगदी सामान्य माणसामध्ये देखील जी सर्जनशीलता असते ती नवकल्पनेसाठी पूरक आहे. गरज पडल्यास एखाद्या मोठ्या समस्येचं निराकरण करण्यासाठी किंवा नवीन उत्पादनासाठी समूहाकडून नवकल्पनांची मागणी केली जाते. यासाठी मस्तिष्कक्षोभ (ब्रेनस्टॉर्मिंग) सभा घेतली जाते.
एखादी कल्पना मनात आल्यावर ती मांडून त्याचं प्रत्यक्षीकरण (प्रॅक्टिकेशन) कसं करता येईल यावर विचार केला जातो आणि मग प्रारूपावर काम केलं जातं. नंतर अनेक परीक्षणांनंतर ते उत्पादन किंवा ती सेवा बाजारात आणली जाते. उपलब्ध साधनसामग्री वापरून नवकल्पनांचा आविष्कार होतो नवीन शोधाची गरज नसते. तरीही परिणाम अचंबित करणारा होऊ शकतो. एक उदाहरण: शहरात बहुतेक सर्वांच्याकडे मोबाइल फोन असतो. तो रिक्षा आणि कॅबचालकांकडेही असतो. मोबाइलमध्ये नकाशा आणि स्थान दाखवण्याची सोयही असते. बस्स.
एका ऍपच्या साह्यानं ज्या ग्राहकाला प्रवास करायचा आहे त्याला जवळपास असलेल्या रिक्षा किंवा कॅबचालकाशी जोडून दिलं जातं. अशा तर्ऱ्हेनं उपलब्ध सामग्रीचा वापर करून लवकरात लवकर सोय उपलब्ध करून दिली जाते. हे ऍप चालवणाऱ्या कंपनीकडे स्वतःची एकही रिक्षा किंवा कॅब असण्याची गरज नसते. अशाच ऍपची निर्मिती करून जवळच्या रेस्टॉरंटमधून गरमागरम खाद्यपदार्थ किंवा अगदी जेवणही काही मिनिटांत ग्राहकाला घरपोच मिळण्याची व्यवस्था झाली आहे. एवढंच काय पण घर शोधणं, विजेची, नळाची स्वच्छतेची कामं करण्यासाठी कर्मचारी घरबसल्या मिळवणं आणि अगदी जीवनसाथी शोधणंही या मार्गानं सोपं झालं आहे.
अर्थात नवकल्पना ऍपपुरत्याच मर्यादित नाहीत. देशातील साधा फॅक्टरी कामगार, शेतकरी यांनीही उपयुक्त यंत्रं नवकल्पनांच्या आधारानं बनवली आहेत. उपलब्ध संसाधनं वापरून एका मोठ्या वाहननिर्मिती कंपनीनं किफायतशीर किंमतीत चारचाकी गाडी उपलब्ध करून दिली होती. ट्रॅक्टर उपलब्ध नसल्यानं मोटरसायकलला एक साधं उपकरण जोडून ट्रॅक्टरची कामं करता येतात हे एका शेतकऱ्यानं करून दाखवलं आहे. मोकळ्या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या एकत्र जोडून पाण्यावर तरंगणारा तराफा एका सामान्य कर्मचाऱ्यानं बनवला आहे.
मी एका मोठ्या कंपनीत नवकल्पना-प्रमुख असताना एका इलेक्ट्रिशियननं सिमकार्ड मोटारगाडीमध्ये गुप्त ठिकाणी चिकटवलं आणि ती मोटारगाडी जर चोरीला गेली तर ती हातातील मोबाइलच्या साह्यानं कशी बंद पाडू शकता येते हे प्रात्यक्षिकानं सिद्ध केलं होतं! इलेक्ट्रॉनिक कार्डाच्या मदतीनं कंपनीतील उपस्थितीची नोंद केली जाते. यासाठी कार्ड खिशाला अडकवून ताणता येणाऱ्या रज्जूनं यंत्रासमोर नेल्यावर हे काम होतं. या ताणता येणाऱ्या रज्जूचा उपयोग करून खिशात ठेवलेला किंवा वापरत असलेला मोबाइल हातातून पडला तरी कसा सुरक्षित राहू शकतो याचं प्रात्यक्षिकच मी माझ्या नवकल्पनांच्या भाषणात अनेकदा दिलं आहे. आज भारत नवकल्पनांची भरारी घेत आहे. आपण त्यांना “जुगाड’ पातळीवर न ठेवता व्यावसायिक रूप देऊ या!
– श्रीनिवास शारंगपाणी