नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नव्या संसद भवनाचे उद्घाटन होणार असून, त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेससह 21 विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
देशाच्या संसदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवे, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वेगळेच विधान केले असून नवीन संसद भवन बांधायला नको होते. सरकारला जुना इतिहास बदलायचा आहे, असे ते म्हणाले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले, ‘सुरुवातीला हे (संसद भवन) बांधले जाणार, असे बोलले जात होते, तेव्हाही आम्हाला हा विचार पटला नाही. हा इतिहास आहे, स्वातंत्र्यानंतर जी गोष्ट सुरू झाली ती तिथेच विकसित व्हायला हवी, ती वेगळी करण्यात अर्थ नाही.’
ते पुढे म्हणाले,’जुना इतिहासच बदलणार का? ते संसदेची नवी इमारत बांधत आहेत, हे आम्हाला पटत नाही. फक्त जुना इतिहास बदलायचा आहे. संसदेची नवीन इमारत बांधायला नको होती. जुने संसद भवन दुरुस्त करायला हवे होते. मी विरोधात आहे. हे सर्व लोक इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे जाऊन उपयोग नाही. तिथे जाण्यात अर्थ नाही. तिथे जाऊन ती इमारत बांधायची काय गरज आहे.’