हवामान बदल, कमी बाजारभावाचा परिणाम
तेजस फडके
निमोणे – शिरूर तालुक्यात उसाबरोबरच कांदा पिकाचे उत्पादन जादा आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचा कांदा पिकाकडे कल वाढत आहे. कमी कालावधीत बाजारभाव चांगला मिळाला तर कधी चांगले पैसे होतात. त्यामुळे कांदा पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. अनेकदा शेतकऱ्यांना चांगला नफा मिळाला आहे. परंतु यावर्षी हवामान, आणि बाजारभावाने साथ दिली नसल्याने कांदा उत्पादक कर्जबाजारी झाला आहे.
कांदा पिकासाठी एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येत असून एकरी 10 टन उत्पादन गृहीत धरले. तरी बाजारभावाप्रमाणे 4 ते 8 रुपये प्रतिकिलो बाजारभाव आहे. सध्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कसाबसा निघत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतातच व्यापाऱ्याला कांदा विकत दिला आहे. त्यामुळे काही शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित राहिले आहेत.
ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी कांदा चाळ उभारणी केलेली आहे. असे शेतकरी कांदा साठवण करुन ठेवण्याच्या तयारीत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत असल्याने काढणीस आलेला कांदा तसेच काढून ठेवलेला कांदा भिजल्याने उत्पादनात घट होऊन आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
अवकाळीने भिजलेला कांदा साठवण करता येणार नसल्याने शेतकऱ्यांना आहे त्या भावात कांदा विकावा लागत आहे. त्यामुळे भविष्यात बाजारभाव वाढला तर मिळणाऱ्या नफ्याला शेतकऱ्यांना मुकावे लागत आहे. उत्पादक सर्वच बाजुने अडचणीत सापडला आहे. यातून त्याला बाहेर काढण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी सरसकट 50 हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
सध्याच्या कमी बाजारभावामुळे आणि अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला कांदा भिजून नुकसान होत आहे. खरीप हंगामात लावलेला कांदा साठवणूक करतानाही आम्हाला अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. कांद्याला सध्या खुपच कमी बाजारभाव असल्याने कांदा बाजारात नेण्यापेक्षा तो न काढलेलाच बरा, अशी वेळ आली आहे.
– एकनाथ वाळुंज, प्रगतशील शेतकरी, शिंदोडी.
कांदा चाळ निर्जंतुकीसाठी गंधक फवारा
कृषी सहायक जयवंत भगत म्हणाले की, शेतकऱ्यांनी कांदा काढणी करण्याअगोदर एक किटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची एक फवारणी घ्यावी. त्यामुळे कांदा साठवणुकीत जास्त दिवस साठवला जाईल. कांदा चांगला वाळवून साठवावा. त्यामुळे आर्द्रता राहणार नाही. किटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची कांदा काढणी करताना फवारणी केल्यास साठवणूक केलेल्या कांद्यात बुरशीमुळे व फुलकिडेच्या प्रादुर्भावाचा परिणाम होणार नाही. कांदा जास्त दिवस टिकला जाईल. कांदा चाळ निर्जंतुक करताना कार्बेन्डाझिमची फवारणी करावी. गंधकाची धुरी करावी. बुरशी नाश पावतील व कांदा जास्त दिवस टिकेल.