मुंबई – मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री पदावरून सतत विविध दावे केले जात आहे. अशात खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केल्यानंतर चांगलीच चर्चा रंगू लागली होती. अशात अमोल कोल्हेंनी केलेल्या विधानाबाबत स्वतः जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेली धुसपूस अद्याप काही लपून राहिलेली नाही. अशात अमोल कोल्हे यांनी जयंती पाटील यांच्यासारखे सुसंस्कृत नेते मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अशात जयंत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,”शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल. तसेच पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असेल हे आता सर्वांनी मेनी केले असल्याचे देखील पाटील यावेळी म्हणाले.
अमोल कोल्हेंनी केलेल्या विधानाबाबत बोलताना पाटील म्हणाले,”अजित पवार, मी आणि आमच्या पक्षाचे सर्वच नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचा प्रयत्न करत आहोत. खासदार कोल्हे हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभेत चांगले काम करत आहेत.राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवणे ही आम्हा सर्वांची भूमिका आहे.त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. माझ्या मुलाच्या सत्काराच्या कार्यक्रमात खासदार कोल्हे यांनी माझे, माझ्या मुलाचे कौतुक केले. त्यापलीकडे त्यांच्याही भावना वेगळ्या नव्हत्या. राज्यात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार हे आता जवळपास सर्वांनी मान्य केले आहे” असं देखील पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
काय म्हणाले होते कोल्हे नेमकं
जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या एका कार्यक्रमात अमोल कोल्हे म्हणले होते,”“महाराष्ट्र राज्याचं सर्वात जास्त वेळा अर्थमंत्रीपद भूषवलेलं आणि आजही ज्यांच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा सर्वात आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहातो, अशा कर्तृत्वसंपन्न पित्याचं कर्तृत्व समोर असताना पित्याच्या कर्तृत्ववाचा माज नाही, तर पित्याच्या कष्टांचं भान आणि पित्याच्या खांद्यावर असणाऱ्या जबाबदारीची जाण असणारं युवा नेतृत्व म्हणून प्रतीक पाटलांकडे मला बघावंसं वाटतं,” असेही अमोल कोल्हे म्हणाले.