कोयनानगर – राज्यातील अन्य बाजार समितीमुळे शेतकऱ्यांचा चौफेर विकास झाला आहे. पाटण तालुका याला अपवाद आहे. सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे बाजार समिती लयाला गेली आहे. ४० वर्षानंतर तालुक्याचे नेतृत्व बदलल्यानंतर तालुका विकासाच्या प्रवाहात आला आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील शेतकरी विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी बाजार समितीत होणारे परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांनी व्यक्त केला.
पाटण कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलच्या रासाटी येथे प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील, उपजिल्हाप्रमुख सावळाराम लाड, सदानंद साळुंखे , भागोजी शेळके, नथुराम सावंत, धोंडीराम भोमकर, उमेदवार सिद्धार्थ गायकवाड, सरपंच प्रदीप पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा, त्याची उन्नती व्हावी हा हेतू नजरेसमोर ठेवून बाजार समितीची स्थापना केली. लोकनेत्यांच्या पश्चात तालुक्यातील शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. व्हिजन नसणारे नेतृत्व तालुक्याला त्या काळात मिळाल्यामुळे तालुक्याची व शेतकऱ्यांची प्रगती खुंटली होती.”
यवंतराव शेलार म्हणाले की विकास काय असतो हे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी ४ वर्षांतच दाखवून दिले आहे. बाजार समिती विकासाच्या प्रवाहात आणायची असेल तर बाजार समितीचे नेतृत्व बदल होणे ही काळाची गरज आहे.
सावळाराम लाड यांनी स्वागत केले. प्रदीप पाटील यांनी आभार मानले.