मांजरी -मांजरी परिसरातील नागरिकांना पिण्याचा शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल. येथील पाणी पुरवठा योजना जलदगतीने पूर्ण करून नागरिकांना पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. आज प्रत्यक्षात येथे पहिल्या टप्प्यात महादेवनगर भागात पाणी मिळत आहे. खऱ्या अर्थाने मांजरीकरांना पाण्यासाठी दिलेला शब्द आज पूर्ण होते आहे, याचे समाधान मिळते आहे, अशी भावना आमदार चेतन तुपे यांनी व्यक्त केली.
मांजरी बुद्रुक-महादेवनगर येथे महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ आमदार तुपे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप घुले, डॉ. शंतनू जगदाळे, अजित घुले यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार चेतन तुपे म्हणाले की, या योजनेची परवानगी मिळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग, रेल्वे विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे मी स्वतः खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह सातत्याने पाठपुरावा केला होता. आज या योजनेचा शुभारंभ झाला ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. मतदारसंघातील नागरिकांना दिलेला शब्द पाळता आला याचे समाधान वाटते. आगामी काळात मांजरी परिसरात पाणी टंचाई जाणवणार नाही, अशा पद्धतीने सदर योजनेचे काम करण्यावर आमचा भर असून याबाबत नागरिकांनीही सूचना कराव्यात, असे तुपे यांनी सांगितले.