नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचा ओघ सर्वानाच माहिती आहे. कामाच्या वेगामुळे ते आज जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकाचे नेते बनले आहेत. दरम्यान, आता याच वेगाने काम करण्याच्या सवयींमध्ये आणखी भर पडणार आहे ती म्हणजे सोमवारपासून सुरू होणाऱ्या त्यांच्या दौऱ्याची. या दौऱ्यामध्ये ते केवळ ३६ तासांमध्ये आठ कार्यक्रमांसाठी आपली हजेरी लावणार आहेत. तब्बल ५,३०० किलोमीटर प्रवास करत ते विविध शहरांचे दौऱे करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सात शहरांमधून ५,३०० किलोमीटरहून अधिक प्रवास करत अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. तसेच सोमवारपासून ३६ तासांत आठ कार्यक्रमांना उपस्थित राहतील. मंगळवारी राजधानी दिल्लीत परतण्यापूर्वी पंतप्रधान मोदी दिल्ली ते मध्य प्रदेश, त्यानंतर दक्षिणेकडील केरळ, त्यानंतर दादरा आणि नगर हवेली आणि पश्चिमेला दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा दौरा करणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
पंतप्रधानांचा प्रवास असा असेल…
पंतप्रधान दिल्ली ते खजुराहो असा प्रवास करतील, सुमारे ५०० किलोमीटर अंतर पार करतील आणि त्यानंतर राष्ट्रीय पंचायती राज दिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रीवा इथं जातील. यानंतर, ते खजुराहो इथं परत येतील, तिथून १७०० किलोमीटर अंतर पार करून कोचीला जातील.
मंगळवारी सकाळी पंतप्रधान मोदी कोची ते तिरुअनंतपुरम असा सुमारे १९० किमीचा प्रवास करतील. तिथे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील आणि विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील.
पुढे पंतप्रधान सुरतमार्गे सिल्वासाला जातील. यात सुमारे १५७० किलोमीटरचा प्रवास करतील. सिल्वासा इथं पंतप्रधान मोदी नमो मेडिकल कॉलेजला भेट देतील आणि विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील.