बेहड्याच्या औषधी गुणधर्मामुळे त्याचं एक नावं आहे अव्यथा. किती समर्पक! हिरड्यापेक्षा बेहड्याची पाने दाट हिरवी किंवा काळसर हिरवी असतात. याला मंजिरी येतात. फुले लहान, फिकट हिरवी आणि साध्या कणसांमध्ये येतात. याच्या फळाला बेहडाच म्हणतात. ते दोन ते तीन सेंमी. लांब, अंडाकृती, दाट केसांनी आच्छादलेले असते. याची साल निळसर किंवा राखी रंगाची असून तिच्यावर खूपशा उभ्या बारीक भेगा असतात आणि आतून ती पिवळी असते. फेब्रुवारी, मार्चमध्ये पानगळ होते आणि लगेच नवपल्लवी येते.
एप्रिलमध्ये सुंदर फुलं येणारं एक झाड आहे; पण त्याला नाव मात्र वाकड्यातिकड्या, मेंढीच्या शिंगासारख्या शेंगा येतात त्यावरून ठेवण्यात आलं आहे- मेडशिंगी. तिची फुलं पांढरी, नाजुक, वैशिष्ट्यपूर्ण आकाराची आणि सुगंधी असतात. वनस्पतीशास्त्रीय नाव डॉप्लिकॅंड्रोन फॅलकॅटा.
कुडा या झाडाचा नुसता पुसटसा उल्लेख आपण मार्चमध्ये केला. एप्रिल हा कुटजमाहात्म्याचा महिना आहे. हलायुधाने त्याला नाव दिलं- गिरिमल्लिका. यक्षाने आषाढात मेघाची पूजा कुटजपुष्पांनी केली, असा उल्लेख मेघदूतात (1.4) आढळतो. कालिदासाने “मेघदूत’ आपल्या नागपूरजवळच्या रामटेक इथेच लिहिले. याचा कुडा किंवा कुटज हा भक्कम पुरावा आहे. उन्हाळा संपता संपता रामटेकच्या डोंगरावर पूजा करण्यासाठी पांढऱ्या कुड्याची फुलंच यक्षाला उपलब्ध झाली. आजही रामटेकच्या भागात मोठ्या संख्येने “कुटजा’ची झाडे आहेत, कारण मुळात ते एक डोंगरी झुडूप आहे. ग्रीष्मातसुद्धा ते फुलतं. म्हणून डोंगराळ भागात त्याचे मोठ्या प्रमाणात वनीकरण केले, तर उन्हाळाही “हिरवा हिरवा ऋतू’ होऊ शकतो. पांढरा कुडा अतिशय औषधी वनस्पती आहे. त्याचे पंचांग औषधी आहे. त्याच्या बियांचे नावही सुंदर आहे. त्या जवाएवढ्या असतात, पण त्यांना म्हणायचे मात्र “इंद्रजव’. कुडा या झाडाला इंग्रजीत “ईस्टर ट्री’ म्हणतात.
ईस्टर हा ख्रिश्चनांचा सण याच महिन्यात येतो. पॅलेस्टाइनमध्ये रोमन व ज्यू लोकांनी येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आलेल्या रविवारी येशू परत जिवंत झाला, अशी श्रद्धा आहे. जगातील सर्व आबालवृद्ध ख्रिस्ती लोक हा सण उत्साहाने साजरा करतात. या दिवशी चर्चवर आकर्षक रोषणाई केली जाते आणि कुड्याच्या शुभ्र, मंद आणि सात्त्विक फुलांनी फार पूर्वीपासून चर्चला सजवले जाते; म्हणून कुड्याचे इंग्रजी नाव ईस्टर ट्री! रविवारी येणाऱ्या ईस्टरबरोबर गुड फ्रायडेसुद्धा एप्रिलमध्येच येतो आणि दर वर्षी मला चिं. वि. जोशींचा तो निरागस विनोद आठवून हसू येतं- “याही वर्षी गुड फ्रायडे शुक्रवारीच आला!’
आयुष्यात मी पाहिलेला सर्वांत मोठा वृक्ष म्हणजे गोरखचिंच. “सीटी ऑफ गार्डन्स’ असणाऱ्या बंगळूरच्या सर्वांत मोठ्या गार्डनमध्ये मी तो पाहिला. सुमारे पाच मीटर व्यासाचा बुंधा असलेला हा वृक्ष भारतातलादेखील सर्वांत मोठा वृक्ष मानला जातो. तो आहे आंध्र प्रदेशात असणाऱ्या गोलकोंडा किल्ल्याच्या परिसरात. मूळचा मध्य आफ्रिकेतला हा वृक्ष हजार वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेतल्या हबशी मजुरांनी आणलेल्या बियांतून लावला गेला. आता तो भारतभर झाला आहे. मी खूप गोरखचिंच पाहिलेत, पण उस्मानाबादला आकाशवाणी कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्समध्ये तीन दिवस राहिल्याने तिथल्या वृक्षाचे भरपूर निरीक्षण करू शकलो. नाथपंथीय गोरक्षनाथांनी या विशाल वृक्षाखाली आपल्या शिष्यांना विद्या दिली, म्हणून याच्या नावात “गोरख’ आले. चिंचेशी याचा काही संबंध नाही. नाव देणाऱ्याच्या पाहण्यात तोपर्यंत चिंचेपेक्षा मोठा वृक्ष नसेल, म्हणून त्याला वाटले- ही गोरखचिंच!
प्रचंड मोठा बुंधा असला, तरी सामान्यपणे गोरखचिंच हा वृक्ष दहा ते पंधरा मीटर उंच असतो. याचा शिशिर एवढा प्रचंड की, संपूर्ण पाने-पाने गळून गेलेले झाड उन्मळून पडल्यासारखे दिसते. गोरखचिंचेची पाने एकांतरित, हस्ताकृती, संयुक्तपर्ण (पामेटली काम्पाउंड) असून गुळगुळीत आणि गडद हिरव्या रंगाची असतात. पर्णिका पाच किंवा कमी-अधिक असू शकतात. एप्रिलनंतर फुले यायला आरंभ होतो.
आपल्या सर्वांच्या पाहण्यातली गुळवेल कुणी मुद्दाम न लावता आपोआप आलेली सर्वत्र दिसेल. तिची फुलं मात्र या महिन्यापासून संपूर्ण उन्हाळाभर पाहायला मिळतील. गुळवेलीची फुलं छोटी-छोटी, हिरवट-पिवळसर रंगाची असतात.
फुलांची जागा वाटाण्याच्या आकाराची फळं घेतात. गुळवेलीची पिकलेली फळे पक्ष्यांना फार आवडतात. त्यांच्यामार्फत गुळवेलीचे परागसिंचन होते. आयुर्वेद गुळवेलीला अमृतासारखी संजीवक मानतो, म्हणून तिचे एक नाव अमृता असेही आहे. गुळवेलसत्त्व या औषधाच्या संदर्भात हे नामकरण आहे. वेलीच्या बोटाएवढ्या जाड फांद्यांचे बारीक तुकडे करून, त्यात पाणी घालून भरपूर उकळायचे अन् गाळून घ्यायचे. या गाळलेल्या अर्कावर प्रक्रिया करून आयुर्वेदिक गुळवेलसत्त्व तयार करतात.
वाघाटी हा लहानपणापासून माझ्या ओळखीचा वेल आहे. एप्रिलमध्ये त्याला फुलं लागतात. फुले पानाच्या बगलेत एकेकटी किंवा दोन-तीन अशी एकत्र येतात. उन्हाळ्यात या वेलाला फळे लागतात. त्या (वाघाट्याच्या) फळांना का कुणास ठाऊक, गोविंदफळ असेही नाव पडले आहे. आषाढी एकादशीला माझ्या गावापासून दोन किलोमीटर लांब असणाऱ्या महादेवाला जाताना काटेरी कुंपणावरचा हा काटेरी वेल हमखास भेटायचा. द्वादशीचे पारणे सोडताना हा भाजीत आवर्जून घालणे, हे चालत आलेले कर्मकांड आहे. नंतर मात्र वर्षभर त्याचे नाव निघायचे नाही आणि इतर फळभाज्यांमध्ये मिसळलेले एक वाघाटे चवीवरून ओळखताही यायचे नाही.
प्रा. व. बा. बोधे यांच्या रसनेला आलेला वाघाट्याचा अनुभव त्यांनी शब्दबद्ध केला आहे. वाघाटे उग्र, कडवट पण चवीला भन्नाट. काटे चुकवत काढावं लागतं. त्याचा वेलही सापासारखा झाडाच्या शेंड्यापर्यंत जातो. काटा तर लय आगाग करणारा. वाघाट्यासारखे चवदार फळ नाही. बेंदाडात लय वाघाटी, मी टोपी भरून आणायचो. आई शेजाऱ्यापाजाऱ्यांना द्यायची. वाघाटी वरुट्यानं फोडायची, मग तेलात परतायची. चटणी-मीठ टाकायचं. कडवटपणा कमी करण्यासाठी चिंच टाकायची. कधी गूळ घालायचा. लालभडक तवंग आलेलं वाघाट्याचं कालवण मटणाला मागं सारायचं.
उन्हाळ्यात खाल्लेल्या टरबुजाच्या खूप आठवणी माझ्या लहानपणात आहेत. पाथरी तालुक्यातील कानसूर हे माझ्या मावशीचे गाव. कानसूर हे गोदावरीच्या काठी आहे. तिथे गोदावरीला गोदावरी कोणीच म्हणायचे नाही, गंगाच म्हणायचे. परभणी जिल्ह्यात गंगा हे दिशावाचक नाव आहे, हे वाचून आश्चर्य वाटेल. सेलूच्या कोर्टात मी समोरासमोरच्या चार भिंतींवर न्यायाधीशांना दिसतील अशी नावे वाचली. खाल्लाकडं, वरलाकडं, डोंगराकडं आणि गंगंकडं. खेड्यातील माणसांना याच दिशा कळतात.
कानसूरला गोदावरीच्या पात्रातील वाळवंटात लावलेल्या टरबुजाच्या वाड्या मी पाहिल्या आहेत. त्याच्या केसाळ कांड्यांवरून हात फिरवला पाहिजे. टरबुजांवरून हात फिरवणे, हीसुद्धा सुखद स्पर्श-संवेदना असते. त्याच्या आतला गोड, गार, गुलाबी गर खाताना मला अजूनही, दहा वर्षे वर्गात शिकवलेल्या गौरी देशपांडे यांच्या “कलिंगड’ या कथेची आठवण होते. कलिंगडापेक्षाही गोड आहे ही कथा.
आमच्या घरात टरबूज ऊर्फ कलिंगडातला गर खाऊन सालपटं फेकून देत नाहीत. हरभऱ्याची भिजवलेली डाळ आणि कांदा घालून त्याची चवदार भाजी होते. टरबुजाच्या मानाने खरबूज तितकेसे आवडत नाहीत. टरबुजांच्या फोडींवर साखर पेरता येते. पेरलेली साखर टरबुजाच्या लालिम्यावर चमकतेही छान आणि टरबुजाच्या माफक गोडव्याला अजून गोड बनवते. हा प्रयोग कुणी खरबुजांवर केल्याचे खाण्यात, पाहण्यात किंवा ऐकिवात नाही.
एप्रिल महिन्यात रामनवमी येते आणि हनुमान जयंतीही. रामफळ रामनवमीच्या सुमारास पिकते, म्हणून त्याला हे नाव मिळाले असावे. कृषी विद्यापीठांनी रामफळ अन् सीताफळ यांचा म्हणे संकर केलाय आणि त्याला नाव दिलंय हनुमानफळ. तुमच्या घरात जर पंचांग नावाची पुस्तिका असेल, तर चैत्र महिना काढून पाहा. शुक्ल पक्षातील अनेक तिथींसमोर अमुक देवाला दवणा वाहणे, तमुक देवाला दवणा वाहणे असे आणि पौर्णिमेला सर्व देवांना दवणा वाहणे- असं लिहिलेलं असेल. त्यातही रामनवमीच्या पूजेत दवण्याला महत्त्वाचे स्थान आहे. सुमारे पंधरा ते तीस सेंमी उंच व सरळ वाढणाऱ्या दवणा या शाखायुक्त व लवदार सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड महाराष्ट्रात जेजुरी व आळंदी भागात विशेषत्वाने केली जाते. दवण्याच्या खालच्या, मधल्या व वरच्या पानांच्या आकारात फरक असतो. खालून वर पानांची विभागणी कमी होत जाते. फुलोरे गोलसर, पिवळट हिरवे, लहान व मंजिरी मार्च-एप्रिलमध्ये येतात. दवण्याचा समावेश सुगंधी वनस्पतीत होतो. दवणा तेल पिंगट, दाट, सुगंधी असून उच्च प्रतीच्या अत्तरात वापरतात. (क्रमशः)
– विश्वावसू काशिकर