माधव विद्वांस
समाजसुधारक, बहुभाषिक, संस्कृत पंडित, भारतीय कायदेपंडित, धर्मशास्त्राचे अभ्यासक, भारतरत्न, महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे यांचा आज स्मृतीदिन. कोकणातून पाच भारतरत्ने मिळाली. म्हणूनच कोकणाला रत्नभूमी म्हणतात. त्यांचा जन्म पेढेपरशुराम, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे 7 मे 1880 रोजी वेदशास्त्रपारंगत व विद्वत्तेची मोठी परंपरा असलेल्या कुटुंबात झाला. त्यामुळे लहानपणीच त्यांचा वेद, उपनिषदे, भगवद्गीतेचा अभ्यास पूर्ण झाला. लहान वयातच त्यांचे मराठीतून तसेच इंग्रजीतून नियतकालिकांमधून लेखन सुरू झाले होते. त्यांनी शिष्यवृत्त्या मिळवून शिक्षण पूर्ण केले. ते बीए ला संस्कृतमध्ये सर्वप्रथम आले.त्याबद्दल त्यांना भाऊ दाजी पारितोषिक मिळाले. मग एलएलबी झाले. नंतर वेदान्त पारितोषिकासह ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालय येथून एमए झाले. त्यानंतर “हिंदू-मुस्लीम कायदा’ घेऊन एलएलएम झाले. या परीक्षेत त्यांनी व्ही. एन. मंडलिक सुवर्णपदक मिळविले.
त्यांनी वर्ष 1904 मधे रत्नागिरी जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक म्हणून कामास सुरुवात केली. त्यानंतर एल्फिन्स्टन हायस्कूल, मुंबई येथे त्यांनी काहीकाळ नोकरी केली. मुंबईच्याच गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापन केले. मुंबई विद्यापीठाचे ते सन 1947 ते 1949 दरम्यान कुलगुरू होते. त्यांनी प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा सखोल अभ्यास करून, सामाजिक अभिसरणाचे भान ठेवून “धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक इतिहास’ नावाचा ग्रंथ सिद्ध केला. तसेच वर्ष 1941 मधे त्यांनी प्राच्यविद्येवरचा ग्रंथ लिहिला. वर्ष 1942 मधे त्यांना “महामहोपाध्याय’ ही पदवी मिळाली. “हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स’ तसेच भारत रामायणकालीन समाजस्थिती आणि धर्मशास्त्रविचार हे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. प्राचीन भाषा, वाङ्मय, महाकाव्य, अलंकारशास्त्र यांचे प्रेम आणि कायदेविषयक जाण, तार्किक मांडणी, प्रथा आणि परंपरांचा कालानुरूप अर्थ लावण्याची क्षमता त्यांच्या लिखाणातून दिसून येते.
खगोलविद्या, सांख्य, योग, तंत्र, पुराणे आणि मीमांसा या विषयांचा अभ्यास करून त्यांनी लेखन केले. लॉर्ड कर्झन, मेकॉलेसह अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी इथल्या संस्कृती, विद्या, ग्रंथ, प्रथा, समाज, रूढी यांची कुचेष्टा केली होती. या सर्व गोष्टींनी व्यथित होऊन वर्ष 1926 मध्ये त्यांनी व्यवहारमयूख हा ग्रंथ प्रसिद्ध केला. जगाला भारतीय उच्च परंपरेची ओळख व्हावी म्हणून त्यांनी भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास सुमारे सात हजार पाने आणि पाच खंडांमध्ये इंग्रजीत लिहिला. “हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’च्या पाच खंडांपैकी चौथ्या खंडाला 1965 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
डॉ. काणे समाजसुधारणा आणि पुरोगामी विचारांचे होते. भारतीय कायदे आणि रुढींचा अभ्यास असलेल्या डॉ. काणेंनी तत्कालीन अनिष्ट चालींविरुद्ध आवाज उठवला होता. विधवांचे केशवपन, अस्पृश्यता यांसारख्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला. एका केस न काढलेल्या विधवेला पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी तिचे वकीलपत्र घेतले होते. आंतरजातीय विवाह, विधवाविवाह तसेच घटस्फोटाचा अधिकार याचेही त्यांनी समर्थन केले. 1953 ते 1959 या काळात पां. वा. काणेंची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. भारत सरकारने 1963 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. 18 एप्रिल 1972 रोजी त्यांचे निधन झाले.