मुंबई काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पाच वेळ अपमान केला आहे. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. मात्र राहुल गांधी यांनी माफी मागीतली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागावी, त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा. उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आता राहुल गांधी हे मातोश्रीवर येण्याची शक्यता आहे. असं झालं तर मातोश्रीवर येणारे ते पहिलेच नेते ठरतील. ही भेट होणार का? याची तारीख काय असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
काल झालेल्या बैठकीनंतर नितीशकुमार, तेजस्वी यादव, राहुल गांधी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जे मुद्दे मांडले ते पाहता आगामी कालावधीमध्ये विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याची जबाबदारी नितीशकुमार यांच्याकडे देण्यात आली आहे. देशात कॉंग्रेस पक्षाशिवाय कोणतीही विरोधी आघाडी शक्य नाही, असे सतत सांगणारे नितीशकुमार यांच्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न जरी अवघड नसले, तरी याच पत्रकार परिषदेमध्ये नेतृत्वाचा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा पत्रकार परिषद गुंडाळण्यात आली, हेसुद्धा लक्षणीय आहे. नितीशकुमार यांनी आधीपासूनच मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही असे अनेकवेळा स्पष्ट केले आहे.