कोणत्याही साध्यापर्यंत जायचे असेल तर त्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी साधनाची आवश्यकता ही असतेच. प्रवासाला जायचं तर गाडी घोडा हवा. सुखाच्या, चैनीच्या चार वस्तू घ्यायच्या म्हटल्या तर गाठीस पैसा हवा. खाण्या-पिण्याची चैन करायची असली तरी त्यासाठी आरोग्याची साथ हवी. परीक्षेत यश मिळवायचे असेल तर त्यासाठी लेखन, वाचन, पाठांतर, अभ्यास करायला हवा. आपल्याला आपले साध्य, उद्दिष्ट गाठण्यासाठी जशी संसार प्रपंच्यात या सर्व साधनांची गरज असते अगदी त्याप्रमाणेच ईश्वर कृपेने प्राप्त झालेल्या नरजन्माचे सार्थक करून घेण्यासाठी एका महत्त्वपूर्ण अशा साधनाची गरज असते. खरं तर ते देऊनच त्या उदार भगवंताने आपल्याला या जगात स्वहितासाठी पाठविलेले आहे. ते साधन म्हणजेच देवाने आपल्याला दिलेला हा देह.
माणसाला प्राप्त झालेल्या देहरूपी साधनाचा त्याला परमार्थ जोडण्यात आणि स्वत:चे कल्याण करून घेण्यात किती उपयोग होतो याचे उचित मार्गदर्शन समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांच्या दासबोधात केलेले आहे. “ज्याने हा देह दिला दान। तयाचे करीत जावे गुणगान’ हा संतबोध त्या देह साधनाचे महत्त्व सांगणाराच.
त्या दयाळू, कृपाळू देवाने आपल्याला काय दिले नाही! त्याने आपल्याला सुंदर डोळे दिलेत. दृष्टी दिलीय. हात, पाय, कान, मुख, वाचा दिली आहे. त्याने दिलेल्या पंच ज्ञानेंद्रियांनी त्याच्या अस्तित्वाचे ज्ञान करून घेणे, त्याची ओळख पटवून घेणे, त्याला पाहणे, त्याच्या सहवासात जाणे, त्याचे नामस्मरण करणे हाच त्या प्राप्त देह साधनाचा सुयोग्य वापर आहे.
डोळ्यांनी देवाच्या सुंदर, साजिऱ्या, सगुण रूपाचे दर्शन घ्यायचे. कानांनी त्याच्या नाम संकीर्तनाचा गजर ऐकायचा. पायांनी तीर्थाटनास जायचे. हातांनी दानधर्म करायचा. साधू- संतांच्या सेवेत देह झिजवायचा. वाचेने सतत ईश्वर नामाची कामाशी सांगड घालायची. सतत त्या ईश्वराचे अनुसंधान ठेवायचे. आपल्या हातून घडत असलेल्या सर्वकर्म कर्तव्याचा कर्ता करविता आपण नाही, तर तो आहे, हे ओळखणे. यानेच जीवाच्या जन्मोजन्मीच्या जन्म-मरणाच्या गाठी सुटतात.
त्याला त्याच्याच हृदयात निवास करणारा तो आत्माराम कळतो. ते चैतन्य समजते. खेळतो हा खेळ पायाच्या प्रसादे, हा पायाचा देहरूपी प्रसाद हा कोणाचा आहे हे ओळखणे आणि देह साधनाच्या सहायाने आत्मतत्त्वाची भेट घडवून घेणे हाच प्राप्त साधनाचा खरा सदुपयोग आहे.