भारतीय संघात आता कोणता फलंदाज ‘प्रमुख फलंदाज’ आहे तेच सांगता येणार नाही, असे चित्र दिसत आहे. पूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा प्रमुख फलंदाज मानले जात होते मात्र, तेच आता इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने बाद होतात की त्यांचे प्रमुख फलंदाज हे पद काढले गेले आहे. त्या जागी गेल्या काही महिन्यांपासून सूर्यकुमार यादवकडे आश्वासकतेने पाहिले जाऊ लागले. मात्र, तोदेखिल आता कोहली व रोहितच्या वळणावर जाऊ लागला आहे.
आपल्या फलंदाजांना नक्की काय झाले आहे तेच समजत नाही. एकेकाळी इनकटर्स किंवा इन स्विंगरवर लिलया चौकार मारणारे कोहली व रोहित सध्या याच चेंडूंवर सातत्याने बाद होत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितचा झेल अप्रतीमपणी स्टीव्ह स्मिथने घेतला हा भाग वेगळा परंतु बाहेरच्या चेंडूला बॅट लावण्याचा मोह अद्याप सोडता येत नाही व त्याचाच जास्त राग येतो.
आत येणारे चेंडू गोलंदाजाच्या हाताकडे पाहून त्यानुसार फटके खेळण्याची क्षमता सचिन तेंडुलकरकडे होती. तीच रोहित व कोहलीनेही घेतली होती. मात्र, आता ते हेच चेंडू एखाद्या सामान्य फलंदाजासारखे खेळतात व बाद होतात. त्याच रांगेत आता सूर्यकुमारही बसत आहे. मिचेल स्टार्कच्या ज्या इनस्विंगरवर तो पायचित बाद झाला तो चेंडू काही फार भारी वगैरे नव्हता पण आपले पाय व डोके चेंडूच्या रेषेत आले नाही की काय होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सूर्यकुमारचे बाद होणे आहे.
कोहलीही तशाच पद्धतीने बाद झाला व त्याचे जास्त नवल वाटले कारण तो सेट झाला होता. सध्या तोच नव्हे तर रोहित, सूर्यकुमार व लोकेश राहुलही असेच बाद होत आहेत. राहुलने पहिला एकदिवसीय सामना जिंकून देताना जी जिद्द दाखवली होती ती आज दिसली नाही. अष्टपैलू हार्दिक पंड्याचा झेलही स्मिथनेच तसाच अप्रतिमरीत्या घेतला, पण पंड्यानेही बाहेर जात असलेल्या चेंडूला बॅट लावलीच होती. या चुका सतत होत असताना या फलंदाजांना सरावादरम्यान का लक्षात येत नाहीत.
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही यात लक्ष घालतात का हादेखील मोठा प्रश्न आहे. सतत सामने खेळल्यामुळे आता प्रेक्षकांनाही या चुका जर लक्षात येत असतील तर त्या फलंदाज व प्रशिक्षकांना लक्षात का येउ नयेत. मिचेल स्टार्क म्हणजे वसीम अक्रम किंवा ग्लेन मॅकग्रा नव्हे की त्याचे चेंडू इतके अनप्लेयेबल निश्चितच नव्हते मात्र, त्याला आपल्याच फलंदाजांनी चुका करू विकेट बहाल केल्या.
#INDvAUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाकडून Team India चा दारुण पराभव
ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका जर विश्वकरंडक स्पर्धेची रंगीत तालिम मानली जात असेल व त्यात भारतीय संघाचे मातब्बर फलंदाज अशा चुका करत असतील तर प्रत्यक्ष विश्वकरंडक स्पर्धेत काय होइल हेदेखील सहज समोर येत आहे.