नारायणगाव -शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील सुप्रिया आत्माराम अहिनवे यांनी एकाच कॅप्सूलमध्ये तीन रिबनचा वापर करून एका वेळी दोन वेगवेगळी लिक्विड औषधे भरले जातील, याचे संशोधन केले आहे. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे भारत सरकारने सुप्रिया अहिनवे यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला आहे. याबाबतच्या संशोधनाचे संपूर्ण अधिकार (पेटंट) त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे पुढील 20 वर्षे (2040 पर्यंत) या केलेल्या संशोधनावर सुप्रिया अहिनवे यांचा पूर्ण अधिकार असणार आहे.
अहिनवेवाडी जवळील चारपडाळी (ता. जुन्नर) शेतकरी कुटुंबातील सुप्रिया यांचे वडील आत्माराम अहिनवे, आई शांता हे शेतकरी कुटूंब असून त्यांना तीन मुली आहेत. सुप्रिया यांनी अतिशय खडतर परिस्थितीत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण मांदारणे, पाचवी ते दहावी मराठी माध्यमातून सरस्वती विद्यालय उदापूर व अकरावी ते बीएससी पर्यंत अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे शिक्षण पूर्ण केले.
दमन येथील ऑलिव्ह हेल्थ केअरफार्मा कंपनीत 2017 मध्ये फॉर्म्युलेशन रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंट म्हणून संशोधनाचे काम करण्यास त्यांनी सुरुवात केली.
काम करत असताना कॅप्सूलमधील औषधी पावडरपेक्षा लिक्विड औषध रक्तामध्ये तत्काळ मिसळून यातून शरीरावर औषधाचे चांगले परिणाम होत असल्याचे त्यांनी आपल्या संशोधनातून शोधले, याबाबतची माहिती सरकारकडे सादर करण्यात आल्यानंतर याची दखल घेत सरकारकडून त्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
शोधानंतर पहिल्यांदाच बदल
1930 च्या सुमारास रॉबर्ट पॉल शेरर यांनी लिक्विड कॅप्सूल बनवण्याचा शोध लावला. त्यामध्ये दोन रिबनचा वापर करून मशीनच्या साह्याने एकच द्रव औषध भरले जात होते. परंतु सुप्रियाने मशीनमध्ये काही बदल करून सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूलमध्ये तीन रिबनचा वापर केल्याने त्याचे भाग तयार होऊन त्यामध्ये दोन लिक्विड औषधे भरले जातील. तिने केलेले संशोधन हे आमूलाग्र क्रांतीचा टप्पा म्हणावा लागेल. तब्बल शंभर वर्षानंतर दोन द्रव पदार्थ भरण्याची किमया केली आहे. औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा उत्पादनाचा, मानवी श्रमाचा व मार्केटिंगचा खर्च कमी झाल्यामुळे रुग्णांना कमी किमतीत औषधे मिळतील. असे अनेक ड्रग आहेत. ते फक्त लिक्विडमध्येच द्यावे लागतात.