मुंबई : तीन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला जात होता. त्यातच पुणे, मुंबई राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच अनेक ठिकाणी गारपीठ झाल्याचेही बघायला मिळाले. काही ठिकाणी होळी दहनाचा कार्यक्रम सुरू असतानाच पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ उडाली होती. दरम्यान, या गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
पुढील काही दिवस राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. काल रात्री पुणे, मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज सकाळीदेखील कल्याण डोंबिवली, जळगाव, नाशिक तसेच अमरावतीसह विदर्भातील काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नाशिक आणि जळगावमधील बागायतदार शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. नाशिकमध्ये द्राक्षांची झाडं कोसळली असून पिकांच मोठं नुकसान झालं आहे. तर जळगावमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊन झाल्याने केळी आणि गहू या पिकांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.
याशिवाय पालघरमध्येही गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे आंब्यासह इतर रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अमरावतीसह विदर्भातील काही भागातही गारपीट झाल्याने कापसांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.