सातारा -सत्तेत राहण्यासाठी काही विकृत लोक पाहिजे ते बरळत आहेत. त्यांच्याकडे काही बोलायला नसले की, ते प्रत्येक वेळी राजघराण्यावर बोलतात. ज्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा आहे, त्या घराण्याविषयी बोलताना थोडी तरी लाज राखा, असा पलटवार खा. उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांच्यावर केला.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी साताऱ्यात शुक्रवारी (दि. 3) पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यावर टीका केली होती. या टीकेचा आज खा. उदयनराजे यांनी समाचार घेतला.
ते म्हणाले, अलीकडच्या काळात असे विकृत लोक काहीही बडबडतात. अशा विकृती वाढतात, त्यावेळी समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम होते. त्यांचा हेतू काय, हे मला माहिती नाही. हे लोक व्यक्तिकेंद्रित आहेत. त्यांनी मोजून, मापून आणि समजून वक्तव्ये केली पाहिजे. मी त्यांना ओळखत नाही आणि महत्त्वही देत नाही.
लोकशाहीत लोकांचा सहभाग व्हावा, ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी मांडली. त्यांनी मांडणी केली नसती, तर आजही राजेशाही असती. आपला देश सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. मागे हा आम्ही छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावा मागत होता. राजकारण करा, आणखी काही करा. आपला पक्ष वाढावा म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करायला काही हरकत नाही; पण इतरांवर शिंतोडे उडवून तुम्ही मोठे होत नाही. ज्यांनी विधान केलं, तेच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होते. सत्तेत राहणे, हेच या विकृत लोकांचे ध्येय आहे. त्यांच्या निर्लज्जपणाची हद्द झाली आहे. त्यांचे विधान म्हणजे राजकीय स्वार्थाचे द्योतक आहे.