मुंबई – मागील काही दिवसांपासून त्यांच्या चमत्काराच्या मुद्द्यावरुन चांगलेच चर्चेत असलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी त्यांनी थेट संत तुकाराम महाराजांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. “संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची’, असे धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणाले असून या विधानामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले, “बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते मात्र शांत आहेत… या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही.” असं रोहित पवार म्हणाले. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी यावेळी ते सवांद साधत होते.
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज नेमकं काय म्हणाले…
“संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुम्ही तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? असं त्यांना विचारण्यात आलं होत. या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले.
ते म्हणाले की, ‘देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी मिळाली. माझ्या पत्नीने माझ्यावर प्रेम केले असते तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते’. असे धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणाले.